
सावंतवाडी: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि कोकणवासीयांच्या स्वप्नातला मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा आश्वासनं दिली गेली, परंतु काम मात्र पूर्ण होताना दिसत नव्हतं. मात्र, आता ही प्रतिक्षा संपण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना या महामार्गासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा महामार्ग एक महत्त्वाचा दुवा ठरतो. मात्र अपूर्ण कामं, खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपघातांची भीती यामुळे या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नितीन गडकरी म्हणाले, मुंबई- गोवा महामार्गाच्या कामात अनेक समस्या आल्या. हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जूनअखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल," असा स्पष्ट आणि ठाम विश्वास त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.
मुंबई-गोवा महामार्ग केवळ मुंबई व गोवा यांच्यामधील दळणवळणासाठी नव्हे, तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि उद्योगांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून गोव्यापर्यंतचा प्रवास केवळ ६ ते ७ तासांत शक्य होईल. तसंच कोकणात पर्यटनाला मोठा चालना मिळेल.
यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी आहे. दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतून कोकणात आपल्या गावी जातात. या काळात महामार्गावर प्रचंड वाहतूक वाढते.
जर नितीन गडकरींनी सांगितल्याप्रमाणे जूनच्या अखेरपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण झालं, तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळेल. वाहतूक कोंडी, अपघात आणि अडथळ्यांपासून सुटका मिळेल आणि प्रवास अधिक सुखकारक होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.