

बंगळूर: ठरावीक कालावधीनंतर घेत असलेली विश्रांती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही ताजीतवानी ठेवणारी ठरत आहे, असे विराट कोहलीने आयपीएलमध्ये शनिवारी केलेल्या अर्धशतकी खेळीनंतर सांगितले.
चिन्नास्वामी स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध झालेल्या या सामन्यात कोहलीने आयपीएलमधील आपले २८वे अर्धशतक केले. त्यामुळे बंगळूर संघाने द्विशतकी धावांचे आव्हान सहा विकेट राखून सहजपणे पार केले.
कोहलीने ३८ चेंडूंत नाबाद ६९ धावा करताना पाच चौकार आणि पाच षटकार मारले. आता केवळ एकदिवसीय आंतररराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेला कोहली गतवर्षीच्या आयपीएल अंतिम सामन्यात प्रथमच टी-२० सामना खेळला.
१० महिन्यांनंतर आयपीएलमधील टी-२० सामना खेळताना तयारी कशी केली, याबाबत विचारले असता कोहली म्हणाला, गेल्या १५ वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट मी खेळलो आहे, त्यामुळे अतिश्रमाचा फटका निश्चितच बसू शकतो. परिणामी, आता ठरावीक अंतराने मिळणारा ब्रेक ताजेतवाने करणारा आहे आणि ऊर्जाही वाढवणारा आहे.
आपण १०० टक्के तंदुरुस्त आहोत, याची जाणीव स्वतःला होत नाही तोपर्यंत आपण स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही. जेव्हा जेव्हा मी मैदानात उतरतो तेव्हा मी १२० टक्के अधिक प्रयत्न करत असतो, त्यामुळे तयारी अपूर्ण असल्याचा प्रश्नच येत नाही, असे कोहलीने सांगितले.
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचा चांगला परिणाम मानसिक सक्षमतेवरही होत असतो. या दोन्ही गोष्टी जुळून आल्यावर संघासाठी निर्णायक योगदान देता येत असते, मी आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि त्याचा फायदा मला आयपीएलमधील या टी-२० प्रकारात होत आहे.
लय मिळवता आली आहे, असे कोहली म्हणाला. अशी लय मिळालेली असते तेव्हा मी वेगवेगळ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतो, असे फटके जे मी अपवादात्मकच खेळलेलो आहे, असेही कोहलीने सांगितले.
४०२७ ः विराट कोहली
३२८५ ः डेव्हिड वॉर्नर
३२३८ ः रोहित शर्मा
२८४३ ः शिखर धवन
२८३२ ः रॉबीन उथप्पा