U19 Asia Cup: टीम इंडियाने नेपाळला दाखवलं आस्मान, 10 विकेट्सने विजयासह सेमीफायनलच्या आशाही कायम

India vs Nepal U19: टीम इंडियाने नेपाळला 19 वर्षांखालील आशिया चषकात पराभूत करत सेमीफायनलच्या आशाही जिवंत ठेवल्या आहेत.
Team India | U19 Asia Cup
Team India | U19 Asia CupX/ACCMedia1
Published on
Updated on

U19 Asia Cup 2023, India vs Nepal:

19 वर्षांखालील आशिया चषक 2023 स्पर्धेत मंगळवारी (12 डिसेंबर) भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात साखळी फेरीतील अखेरचा सामना झाला. दुबईला झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. आता मंगळवारी होत असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील साखळी फेरीच्या सामन्यावर भारताचे उपांत्य फेरीत पोहण्याचे समीकरण अवलंबून आहे.

जर पाकिस्तानने विजय मिळवला, तर भारतीय संघ थेट उपांत्य फेरी गाठेल, पण जर अफगाणिस्तानने विजय मिळवला, तर नेट रनरेटच्या फरकाच्या जोरावर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दोन संघ उपांत्य फेरीत पोहचतील. दरम्यान नेपाळला पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.

Team India | U19 Asia Cup
U19 World Cup 2024 स्पर्धेचे वेळापत्रक घोषित! युवा टीम इंडिया 'या' संघांशी करणार दोन हात

मंगळवारी झालेल्या सामन्यात नेपाळने भारतासमोर 53 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 7.1 षटकातच एकही विकेट न गमावता 57 धावा करत पूर्ण केला. भारतासाठी गोलंदाज राज लिंबानी विजयाचा नायक ठरला. त्याने 9.1 षटके गोलंदाजी करताना अवघ्या 13 धावा देत 7 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकत नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या निर्णयाचा भारतीय गोलंदाजांनी फायदा घेतला.

भारताकडून राज लिंबानी आणि आराध्य शुक्ला यांनी सुरुवातीलाच नेपाळला मोठे धक्के दिले. या दोघांनी मिळून 21 धावातच 6 विकेट्स घेतल्या. नंतरच्या 4 विकेट्सपैकीही राजने तीन विकेट्स घेतल्या.

Team India | U19 Asia Cup
U19 Asia Cup: 'बाप'माणूस ज्याने घडवले दोन क्रिकेटपटू! सर्फराजनंतर आता मुशीर करणार टीम इंडियाकडून पदार्पण

दरम्यान, नेपाळने कसेबसे 50 धावांचा टप्पा पार केला. पण भारतीय गोलंदाजांनी 22.1 षटकात नेपाळचा डाव 52 धावांवरच संपवला.

नेपाळकडून एकाही खेळाडूला दोनआकडी धावसंख्या पार करता आली नाही. त्यांच्याकडून हेमंत धामीने सर्वाधिक 8 धावा केल्या. भारताकडून राज व्यतिरिक्त आराध्य शुक्लाने २ विकेट्स घेतल्या, तर आर्शिन कुलकर्णीने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 53 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून आर्शिन कुलकर्णीने आक्रमक खेळ केला. त्याला आदर्श सिंगने चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने 8 व्या षटकातच विजय निश्चित केला. आर्शिन 30 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांसह 43 धावा करून नाबाद राहिला. आदर्शने नाबाद 13 धावा केल्या.

भारताने या स्पर्धेत साखळी फेरीत यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानविरुद्ध पराभव स्विकारला आहे. आता नेपाळविरुद्धही विजय मिळवल्याने भारताने 4 गुण झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com