

T20 World Cup 2026 Controversy: टी-20 विश्वचषक 2026 पूर्वी क्रिकेट विश्वात सध्या मोठे वादळ निर्माण झाले असून आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) वादात आता पाकिस्तानची अवस्था 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला विश्वचषकात स्थान देण्याची घोषणा केली.
सुरक्षिततेच्या कारणास्तव भारताचा प्रवास करण्यास बांगलादेशने नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, आयसीसीच्या या भूमिकेचा निषेध करत पाकिस्ताननेही विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. आता याच वादात एक मोठी अपडेट समोर आली असून पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यास त्याचा थेट फायदा बांगलादेशला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'हिंदुस्थान टाइम्स'ने दिलेल्या अहवालानुसार, जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) खरोखरच विश्वचषकातून माघार घेतली, तर आयसीसी पाकिस्तानच्या रिक्त जागी बांगलादेशला पुन्हा स्पर्धेत सामावून घेण्याची दाट शक्यता आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्यास बांगलादेशला गट 'अ' मध्ये (Group A) स्थान दिले जाईल.
विशेष म्हणजे, बांगलादेशने (Bangladesh) सुरुवातीला मागणी केल्याप्रमाणे त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाऊ शकतात. यामुळे आयसीसीला लॉजिस्टिक किंवा नियोजनाच्या बाबतीत फारशा अडचणी येणार नाहीत. पाकिस्तानने घेतलेली विरोधाची भूमिका आता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत, कारण त्यांच्या माघारीमुळे ज्या बांगलादेशसाठी त्यांनी आवाज उठवला होता, त्याच बांगलादेशची स्पर्धेत वापसी होऊ शकते.
पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी आयसीसीचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले होते. या संदर्भात ते पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ श्रीलंकेला रवाना होणार की नाही, याचा फैसला येत्या शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत होण्याची शक्यता आहे. एकीकडे बहिष्काराची चर्चा सुरु असतानाच पाकिस्तानने आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
निवडकर्ते आकिब जावेद यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचे काम केवळ सर्वोत्तम संघ निवडणे होते आणि आता संघ पाठवायचा की नाही, हा निर्णय पूर्णपणे सरकारचा असेल. पाकिस्तानने जाहीर केलेल्या या संघात सलमान अली आगाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून संघात बाबर आझम, फखर जमान, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. आता पाकिस्तान सरकार देशाच्या स्वाभिमानासाठी बहिष्काराचा निर्णय घेते की बांगलादेशला आपली जागा मिळवून देण्यापासून वाचवण्यासाठी स्पर्धेत उतरते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.