

Bucknor statement on Sachin: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णयांपैकी एकावर तब्बल 22 वर्षांनंतर अखेर पडदा पडला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला चुकीच्या पद्धतीने बाद देणारे वेस्ट इंडिजचे माजी अम्पायर स्टीव्ह बकनर यांनी आता आपली ती चूक जाहीरपणे कबूल केली. या बातमीमुळे जगभरातील करोडो भारतीय चाहत्यांच्या मनातील जुन्या आणि कटू आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
2003-04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन कसोटीतील तो प्रसंग आजही क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे, जेव्हा सचिनला चुकीचा निर्णय देऊन माघारी धाडण्यात आले होते. या एका निर्णयाने त्यावेळी केवळ सामन्याचे चित्रच बदलले नाही, तर क्रिकेट जगतात तंत्रज्ञानाच्या गरजेवर मोठी चर्चाही सुरु केली होती.
त्या ऐतिहासिक ब्रिस्बेन कसोटीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीचा एक चेंडू सचिनच्या पॅडला लागला आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले. अम्पायर स्टीव्ह बकनर यांनी थोडाही विचार न करता आपले बोट वर करुन सचिनला बाद घोषित केले.
रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, चेंडू स्टंपच्या बराच वरुन जात होता, मात्र त्यावेळी डीआरएस सारखे तंत्रज्ञान नसल्याने सचिनला केवळ 3 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. प्रसिद्ध समालोचक टोनी ग्रेग यांनी थेट समालोचनात या निर्णयाला 'भयानक निर्णय' असे संबोधले होते. या एका चुकीच्या निर्णयामुळे भारतीय चाहत्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता आणि भारतीय संघाच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम झाला होता.
आता 79 वर्षांच्या झालेल्या स्टीव्ह बकनर यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट अंपायर्स असोसिएशनला दिलेल्या मुलाखतीत ही चूक मान्य केली. सचिनविरुद्ध दिलेला तो पायचितचा निर्णय आपली एक मोठी चूक होती, असे त्यांनी कबूल केले. आजही लोक त्या निर्णयाबद्दल बोलतात आणि आयुष्यात चुका होतात, हे मान्य करत त्यांनी त्या प्रकरणावर आता स्पष्टीकरण दिले.
22 वर्षांनंतर आलेली ही कबुली भारतीय चाहत्यांसाठी एक मोठा प्रसंग आहे, कारण हा निर्णय आजही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या चुकांपैकी एक मानला जातो. मात्र, हे केवळ एकदाच घडले नव्हते. या घटनेच्या दोन वर्षांनंतर भारत-पाकिस्तान सामन्यातही अब्दुल रज्जाकच्या चेंडूवर सचिनचा बॅटला स्पर्शही झाला नसताना बकनर यांनी त्याला बाद दिले होते.
सचिननेही गेल्या वर्षी एका 'आस्क मी एनीथिंग' सत्रात या घटनेची मजेशीर आठवण सांगितली होती. जेव्हा त्याला बकनर यांच्या त्या निर्णयाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो हसत म्हणाला होता की, जेव्हा मी फलंदाजी करत असे, तेव्हा बकनर यांनी बॉक्सिंग ग्लव्हज घातले पाहिजे होते, जेणेकरुन ते आपले बोट वर करु शकणार नाहीत.
22 वर्षांनंतर आलेल्या या कबुलीमुळे क्रिकेट इतिहासातील त्या जुन्या जखमेवर मलम लावल्यासारखे झाले असले, तरी अम्पायर तंत्रज्ञानापेक्षा वरचढ होते त्या काळातील दहशतीची आठवण ही बातमी करुन देते. आज जरी डीआरएसमुळे अचूकता वाढली असली तरी बकनर यांची ही कबुली क्रिकेट चाहत्यांच्या मनातील सचिनबद्दलचा आदर आणि त्यावेळच्या अन्यायाची भावना पुन्हा एकदा अधोरेखित करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.