Irani Cup: शेष भारतानं जिंकले विजेतेपद! जयस्वालच्या मध्य प्रदेशविरुद्ध 300 पेक्षाही जास्त धावा

शनिवारी शेष भारतीय संघाने जयस्वालच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मध्य प्रदेशला पराभूत करत इराणी कप जिंकला आहे.
Rest Of India Team | Irani Cup
Rest Of India Team | Irani CupDainik Gomantak
Published on
Updated on

Irani Cup: रविवारी इराणी कप स्पर्धेचे विजेतेपद शेष भारतीय संघाने मिळवले आहे. शेष भारतीय संघाने 2021-22 रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मध्य प्रदेश संघाला सामन्याच्या पाचव्या दिवशी 228 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्याचा सामनावीर युवा यशस्वी जयस्वाल ठरला. त्याने या सामन्यात 300 हून अधिक धावा काढल्या.

ग्वाल्हेरला झालेल्या या सामन्यात शेष भारतीय संघाने दिलेल्या 437 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मध्यप्रदेशचा संघ पाचव्या दिवशी 58.4 षटकांत 198 धावांवर सर्वबाद झाला. मध्य प्रदेशकडून कर्णधार हिमांशू मंत्रीने 51 धावांची खेळी केली होती. तसेच हर्ष गवळीने 48 आणि अमन सोळंकीने 31 धावांची खेळी केली. पण या तिघांव्यतिरिक्त एकही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

शेष भारताकडून सौरभ कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश कुमार, अतीत शेठ आणि पुलकित नारंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर नवदीप सैनीने एक विकेट घेतली.

Rest Of India Team | Irani Cup
Irani Cup: जयस्वालचा द्विशतकी धमाका! 'हा' भीमपराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय क्रिकेटर

तत्पूर्वी या सामन्यात शेष भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अभिमन्यू ईश्वरन आणि यशस्वी जयस्वाल यांनी योग्य ठरवत पहिल्याच डावात ताबडतोड फलंदाजी केली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 371 धावांची भागीदारी रचताना मोठ्या खेळी केल्या.

ईश्वरनने 240 चेंडूत 154 धावांची खेळी केली. तसेच जयस्वालने काहीशी आक्रमक खेळी करताना 30 चौकार आणि 3 षटकारांसह 259 चेंडूत 213 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त यश धूलने 55 धावांची खेळी केली. त्यामुळे शेष भारताने पहिल्या डावात 121.3 षटकात सर्वबाद 484 धावा केल्या. मध्य प्रदेशकडून अवेश खानने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मध्य प्रदेश संघाचा पहिला डाव 112.5 षटकात 294 धावांवर संपला. या डावात यश दुबेने 109 धावांची शतकी खेळी केली. सारांश जैन (66) आणि हर्ष गवळी (54) यांनी अर्धशतके केली. तसेच शेष भारताकडून पुलकित नारंगने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान, शेष भारताला या डावात 190 धावांची भक्कम आघाडी मिळाली.

Rest Of India Team | Irani Cup
Irani Cup: बीसीसीआयने सर्फराज खानला का डावललं? अखेर खरं कारण आलं समोर

दुसऱ्या डावातही शेष भारताकडून यशस्वी जयस्वालची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने 157 चेंडूत 16 चौकार आणि 3 षटकारांसह 144 धावांची खेळी केली. पण त्याच्याव्यतिरिक्त शेष भारताकडून कोणीही अर्धशतकही करू शकले नाहीत. त्यामुळे शेष भारताचा डाव 71.3 षटकात 246 धावांवर संपला.

पण पहिल्या डावातील 190 धावांच्या आघाडीमुळे त्यांनी मध्य प्रदेशसमोर 437 धावांचे आव्हान ठेवले. या डावात मध्य प्रदेशकडून अवेश खान, अंकित कुशवाह, सारांश जैन आणि शुभम शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कुमार कार्तिकेयला 1 विकेट मिळाली.

दरम्यान, जयस्वाल या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने 2 डावात मिळून 178.50 च्या सरासरीने 357 धावा केल्या. तो इराणी कपमध्ये एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा पहिलाच खेळाडूही ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com