India Women vs West Indies Women: भारतीय महिला संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून यजमान आणि वेस्ट इंडीज महिला संघाविरुद्ध तिरंगी टी20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. सोमवारी भारतीय महिला संघाचा सामना इस्ट लंडनला वेस्ट इंडीज महिला संघाविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने 56 धावांनी विजय मिळवला.
भारताचा हा या मालिकेतील सगल दुसरा विजय असल्याने अंतिम सामन्यात पोहचण्याच्या जवळ संघ पोहचला आहे. भारताच्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयात हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली.
या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 168 धावांचे आव्हान ठेवले होते. पण वेस्ट इंडिजने पहिल्या तीन विकेट्स झटपट गमावल्या. 7 षटकांच्या आतच 25 धावांवर वेस्ट इंडिजने 3 विकेट्स गमावल्या होत्या.
पण, त्यानंतर हेली मॅथ्यूज आणि शेमैन कॅम्पबेल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र या दोघीही आक्रमक होणार नाहीत, याची काळजी भारतीय गोलंदाजांनी घेतली. त्यामुळे त्याला निर्धारित 20 षटकात वेस्ट इंडिजला विजय मिळवून देता आला नाही.
कर्णधार मॅथ्यूजने 29 चेंडूत 34 धावांची नाबाद खेळी केली. तसेच कॅम्पबेलने 57 चेंडूत 47 धावांची खेळी केली. या दोघींमध्ये 71 धावांची भागीदारी झाली. मात्र त्यासाठी त्यांनी 67 चेंडू खेळले. अखेर वेस्ट इंडिजला 20 षटकात 4 बाद 111 धावाच करता आल्या.
भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. या 2 विकेट्स घेताना तिने 29 धावा दिल्या. तसेच राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दरम्यान, राधा यादवने एक विकेट घेताना 4 षटकात केवळ 10 धावाच दिल्या.
तसेच राजेश्वरीने केवळ 16 धावा दिल्या. त्याचबरोबर शिखा पांडेनेही चांगली गोलंदाजी केली. तिला विकेट मिळाली नसली, तरी तिने धावा रोखण्यात मोलाचा वाटा उचलला. तिने 4 षटकात 18 धावा दिल्या.
(India Women won against West Indies Women by 56 runs in T20I Tri Series)
तत्पूर्वी या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताकडून सलामीला खेळायला आलेली यास्तिका भाटीया (18) आणि तिसऱ्या क्रमांकावर उतरलेली हरलीन देओल (12) 10 षटकांच्या आतच बाद झाले.
पण, त्यानंतर मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत यांनी भारताचा डाव सांभाळला. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची नाबाद भागीदारी रचली. या दरम्यान दोघींनी वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली.
मानधनाने 51 चेंडूत 74 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत तिने 10 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच हरमनप्रीतने 35 चेंडूत 8 चौकारांसह 56 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे भारताने 20 षटकात 2 बाद 167 धावा उभारल्या.
दरम्यान, भारताने यापूर्वी या मालिकेतील पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध जिंकला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.