IND vs BAN: शुभमन गिलचं शतक व्यर्थ! भारताचा पराभव करत बांगलादेशने केला शेवट गोड

Asia Cup 2023: बांगलादेशने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या शेवटच्या सुपर फोर सामन्यात भारताला अखेरच्या षटकात पराभवाचा धक्का दिला.
Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak

Asia Cup 2023 Super Four Bangladesh won by 6 runs against India :

आशिया चषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सुपर फोर फेरीतील सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी (15 सप्टेंबर) झाला. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने 6 धावांनी रोमांचक विजय मिळवत या स्पर्धेची अखेर त्यांच्यासाठी गोड केली.

हा बांगलादेशचा या स्पर्धेतील अखेरचा सामना होता. त्यांचे या सामन्यातील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. तसेच, भारताने यापूर्वीच अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केलेला असल्याने आता भारतीय संघ 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.

या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर २६६ धावांचे आव्हान ठेवले होते. पण भारताचा संघ 49.5 षटकात 259 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून शुभमन गिलने शतकी खेळी केली. तसेच अक्षर पटेलने 42 धावांची झुंज दिली. मात्र, अन्य भारतीय खेळाडूंना फार काही करता आले नाही.

Shubman Gill
IND vs BAN: शाकिब-हृदोयच्या फिफ्टीने सावरलं, बांगलादेशचं शेपूटही वळवळलं, भारतासमोर 266 धावांचे आव्हान

भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर पदार्पणवीर तान्झिम हसन साकिबने रोहितला शुन्यावर बाद केले. त्यानंतर त्यानेत तिसऱ्या षटकात तिलक वर्माला 5 धावांवर त्रिफळाचीत केले.

त्यानंतर गिल आणि केएल राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र, केएल राहुलचा अडथळा मेहदी हसनने 18 व्या षटकात दूर केला. त्यानंतर लगेचच मेहदी हसन मिराजने इशान किशनला 5 धावांवर बाद केले.

सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या सूर्यकुमार यादवने गिलला साथ देण्यास सुरुवात केली होती. या दोघांमध्ये चांगली भागीदारीही चालू होती. पण त्याचवेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने 33 व्या षटकात सूर्यकुमारला चकवले आणि त्याला 26 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे भारताची अवस्था 139 धावांत 5 विकेट्स अशी झाली होती.

दरम्यान असे असले तरी एक बाजू भक्कमपणे शुभमन गिलने सांभाळली होती. त्याने रविंद्र जडेजाबरोबर भागीदारी करत असताना शतकही साजरे केले. मात्र, त्याचा जडेजाही फार वेळ साथ मिळाली नाही. जडेजा 7 धावांवर मुस्तफिजूर रेहमान विरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला.

त्यानंतर काही वेळात दमदार खेळ करणाऱ्या शुभमन गिलला मेहदी हसनने आपल्या जाळ्यात फसवत बाद केले. गिलचा झेल तौहिद हृदोयने घेतला. गिल 133 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांसह 121 धावा करून बाद झाला. असे असले तरी अक्षर पटेलने जबाबदारी खांद्यावर घेत आक्रमक फलंदाजी करताना भारताला विजय मिळवून देण्याता प्रयत्न केला.

मात्र, 49 वे षटक भारतासाठी मोठे धक्के देणारे ठरले. अखेरच्या 2 षटकात 17 धावांचीच गरज असताना पहिल्या चेंडूवर मेहदी हसन मिराजने शार्दुल ठाकूरला 11 धावांवर बाद केले, तर चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलला माघारी धाडले. अक्षरने 34 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 42 धावांची झुंजार खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर मात्र सामना बांगलादेशकडे वळला. अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमी 6 धावांवर धावबाद झाला आणि भारतीय संघाचा डावही संपुष्टात आला.

बांगलादेशकडून मुस्तफिझुर रेहमानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच तान्झिम हसन साकिब आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवत बांगलादेशला सुरुवातीला मोठे धक्के दिले होते. त्यांच्या पहिल्या चार विकेट्स 14 षटकांच्या आत 59 धावांवरच गेल्या होत्या. पण नंतर शाकिब अल हसन आणि तौहिद हृदोय यांनी 101 धावांची भागीदारी करत बांगलादेशला सावरले.

पण त्यांची जोडी शार्दुल ठाकूरने शाकिबला 80 धावांवर त्रिफळाचीत करत तोडली. शाकिबने 85 चेंडूत केलेल्या या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर लगेचच शमिम हुसैनही 1 धावावर माघारी परतला. पण नंतर हृदोय आणि नसुम अहमदने डाव पुढे नेला.

Shubman Gill
Ravindra Jadeja: जड्डूची विकेट्सची 'डबल सेंच्युरी'! 'असा' पराक्रम करणारा बनला दुसराच भारतीय

मात्र अर्धशतकानंतर हृदोयही मोहम्मद शमीविरुद्ध खेळताना तिलक वर्माकडे झेल देत बाद झाला. त्याने 81 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावा केल्या. त्याच्यानंतर नसुमने मेहदी हसनला साथीला घेतले. त्यांनी 8 व्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली. मात्र, नसुम 44 धावांवर 48 व्या षटकात बाद झाला.

मेहदी हसन आणि तान्झिम हसन साकिब यांनी अखेरीस काही आक्रमक शॉट्स खेळत बांगलादेशला 50 षटकात 8 बाद 265 धावांपर्यंत पोहचवले. मेहदी हसन 29 धावांवर आणि तान्झिम हसन साकिब 14 धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com