
‘जोर का धक्का धीरे से’ म्हणतात, त्याप्रमाणे युरी आलेमाव यांना भाजपा आणि आम आदमी पक्षाचे जोराचा डबल धमाका धक्का दिला आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात येणाऱ्या पारोडा, चांदर, गिरदोली, माकाझान व आंबावली पंचायतीचा भाग हे काँग्रेस पक्षाचे बालेकिल्ले. कुंकळ्ळीत काँग्रेस पक्ष यशस्वी होतो, याच पंचायतीतील मतदारांच्या नव्वद टक्के मतदारांच्या पाठिंब्यामुळे कुंकळ्ळीचे विद्यमान आमदार व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव याच मतदारांच्या पाठिंब्याने आमदार बनले होते. मात्र आता भारतीय जनता पक्षाने व आम आदमी पक्षाचे युरी आलेमाव यांना चांदर व पारोडा या पंचायतीत धक्का दिला आहे. चांदर पंचायतीचे माजी सरपंच व काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक हेनरी व त्यांच्या समर्थकांनी आम आदमी पक्षात प्रवेश करून युरी आलेमाव यांना जोर का धक्का दिला. तर युरी आलेमाव यांच्या समर्थकांच्या हातात असलेली पारोडा पंचायत भाजपाच्या ताब्यात आली असून भाजपा समर्थक सरपंच व उपसरपंच या पंचायतीवर निवडून आले आहेत. आता अशीच स्थिती माकाझान व गिरदोलीत पहायला मिळणार असा दावा युरी विरोधक करतात. कुंकळ्ळीवरची युरीची पकड ढिली व्हायला लागली आहे. ∙∙∙
प्रतिमा कुतिन्हो या आपल्या नव्या राजकीय इनिंगच्या तयारीला लागल्या आहेत. त्या सध्या नव्या पक्षाच्या शोधात आहेत. यापूर्वी त्या कॉंग्रेस व आपमध्ये मुशाफिरी करून आल्या आहेत. आपच्या उमेदवारीवर त्यांनी नावेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र पदरी पराभव आला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा नावेलीतून नशीब अजमाविण्याचे त्यांचे पक्के ठरले आहे. प्रतिमा चळवळ्या स्वभावाच्या, त्या एका जागी जास्त दिवस राहू शकत नाहीत. आता त्या कुठल्या पक्षात जातात, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे. तूर्त ‘वेट अँड वॉच.’ ∙∙∙
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाला राज्यभरातून येण्यासाठी बससेवा आहे. सायंकाळच्या चहापानाची व रात्रीच्या जेवणाचीही सोय कार्यक्रमस्थळी करण्यात आली आहे. बस पंचायत क्षेत्रवार निघणार असल्या तरी त्यांचे मापन मतदारसंघवारच होणार आहे. यामुळे कोणाच्या मतदारसंघातून किती जण आले, याचे गणित भाजपचे धुरीण निश्चितपणे मांडणार आहेत. यासाठी प्रत्येकजण आपल्या मतदारसंघाची गर्दी दिसावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे आज कोणाची गर्दी याकडे भाजपमधीलच सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. ∙∙∙
या पावसाळ्याच्या सुरवातीलाच गावणेतील मुख्य रस्त्याच्या कडेची भली मोठी संरक्षक भिंत कोसळली आणि रस्ताच बंद झाला. धुवांधार पाऊस कोसळत असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली, शेवटी आमदार सुदिनराव धावले आणि त्यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी आदेश देऊन तशी यंत्रणाही राबवली. संरक्षक भिंत कोसळली म्हटल्यावर धोका कायम होता. आता पावसाळा ओसरतो न ओसरतो तोच या भल्या मोठ्या संरक्षक भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. एवढ्या लवकर कार्यवाही झाल्यामुळे सध्या गावणेवासीय खूष आहेत, कारण या नव्या संरक्षक भिंतीमुळे पुढील धोका टळला ना..! ∙∙∙
जो मेहनत घेतो, त्याचे फळ त्याला आज नाही तर उद्या मिळतेच. मडगावचे नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांच्या बाबतीत ते खरे ठरले. दामूंचा प्रभाग २१. या प्रभागातील स्वच्छतेबाबत त्यांचा सरकारी पातळीवर सत्कार केला व तोही दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर. या सत्काराला खरोखरच शिरोडकर हे पात्र आहेत, हे त्यांच्या प्रभागात फेरफटका मारल्यास कुणीही नाकारणार नाहीत. आता आपल्या प्रभागातील लोकांसाठी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. मडगाव पालिकेच्या अन्य नगरसेवकांसाठी दामूबाबाने एक आदर्श परिपाठ घालून दिला आहे, यात कुणाचेही दुमत नसावे. ∙∙∙
गांधी जयंतीदिनी मंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मडगावच्या खादी ग्रामोद्योग दुकानाला भेट दिली. दोघांनीही खादीचे कपडे व इतर काही साहित्य खरेदी केले. स्वदेशी तत्वाबाबत जागृती केली. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असेच म्हणावे लागेल. त्याच बरोबर दिगंबर कामत यांनी तिथेच असलेल्या गांधीजींचा चरखा चालविण्याचा सुद्धा आनंद उपभोगला. दामू नाईक यांनी सुद्धा चरख्यावर हात फिरवला. खादी ही राष्ट्रीय ताकद, लवचिकता व सर्वसमावेशक विकासाच्या बांधीलकीचे प्रतीक असे कामत म्हणाले. लोकांनी ब्रँडेड कपडे व इतर वस्तू पेक्षा स्वदेशीवर जास्त भर द्यावा, असा संदेश कामत व नाईक देत आहेत. ∙∙∙
राजकीय गलियारोंमध्ये सध्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे गोव्याचे राजकारण आता म्हणे एका निर्णायक क्षणावर येऊन थांबले आहे. दिल्लीतून मोठे नेते वारंवार गोव्यात येतात आणि थेट राज्यातील आपल्या बड्या नेत्यांना ‘लक्ष्य’ देतात. यासाठी काही दमदार नेत्यांना शांत बसविण्यासाठी ‘विशेष पॅकेज’ देण्याचे आमिष दाखवले जाते. दुसरीकडे, गोयकारपण जपण्याची हाक देणारे स्थानिक पक्ष आता केवळ ‘भावनात्मक’ राजकारण करून चालणार नाही, हे जाणून आहेत. आणि आता हे स्थानिक पक्ष पडद्यामागे मोठी ‘एकजूट’ साधण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा राज्यात रंगू लागली आहे. आता खरी गंमत इथे आहे ती दिल्लीहून येणारा ‘पैसा आणि ताकद’ जिंकणार? की ‘गोयकार अस्मितेची हाक’ लोकांना एकत्र आणून स्थानिक पक्षांना मोठे यश मिळवून देणार? येणारी निवडणूक गोव्याच्या भविष्याची दिशा ठरवणारी ठरणार आहे, हे नक्की! ∙∙∙
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते माझे घर योजनेंतर्गत विविध कायदा दुरुस्तीमुळे लागू होणारे लाभ देणे सुरू होणार आहे. त्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमावेळी १० हजाराहून अधिक जण एकत्र येतील, असा सरकारी अंदाज आहे. यासाठी सर्वकाही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी कार्यक्रमस्थळी जात त्याचा आढावा घेतला. कार्यक्रमस्थळी लोक केव्हापासून येण्यास सुरुवात होईल आणि त्यांच्या चहापानाची व्यवस्था असण्यापासून शहा कार्यक्रमस्थळाहून निघेपर्यंतच्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेत कोणतीही कसूर न ठेवण्याचा संदेश दिला आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.