खरी कुजबुज: युरीही लागले कामाला

Khari Kujbuj Political Satire: मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे म्हटले आहे, तर अभियंत्यांची बदली केली जाणार असल्याचे स्पष्ट केले, परंतु रस्त्यांची स्थिती पुन्हा अशी होणार नाही याची जबाबदारी निश्चित केली जाईल की पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार?
Khari Kujbuj Political Satire: मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे म्हटले आहे, तर अभियंत्यांची बदली केली जाणार असल्याचे स्पष्ट केले, परंतु रस्त्यांची स्थिती पुन्हा अशी होणार नाही याची जबाबदारी निश्चित केली जाईल की पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार?
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

युरीही लागले कामाला

विरोधी पक्षनेते हे महत्त्वाचे पद मिळालेले असतानाही कुंकळ्‍ळीचे आमदार युरी आलेमाव हे आपल्‍याच स्‍वत:च्‍या कामात व्‍यस्‍त असतात अशी त्‍यांच्‍यावर काहीजण टीका करायचे. याचे कारण म्‍हणजे, काँग्रेसने आयोजित केलेल्‍या आंदोलनात त्‍यांचा फारसा सहभाग नसायचा आणि विविध मतदारसंघात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकणेही ते करत नसत. मात्र, आता कदाचित दक्षिण गोव्‍याचे खासदार विरियातो फर्नांडिस हे सक्रिय झाल्‍यामुळे युरीबाबही सक्रिय झाले आहेत. कॅप्‍टननी प्रत्‍येक गुरुवारी ‘झिरो अवर विथ कॅप्‍टन’ हा कार्यक्रम जाहीर करून विविध मतदारसंघांचे दौरे सुरू केल्‍यावर आता युरीबाबही सक्रिय होऊन त्‍या मेळाव्‍यात दिसू लागले आहेत. तेथे जाऊन ते आता भाषणेही करू लागले आहेत. या माध्‍यमातून युरी आता तरी आपला लोकांकडे कनेक्‍ट वाढविणार का? ∙∙∙

अभियंत्यांवर कारवाई होणार?

रस्त्यांची स्थिती वाईट होऊन आता बिकट झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे म्हटले आहे, तर अभियंत्यांची बदली केली जाणार असल्याचे स्पष्ट केले, परंतु रस्त्यांची स्थिती पुन्हा अशी होणार नाही याची जबाबदारी निश्चित केली जाईल की पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार? यात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असून रस्ते उच्च दर्जाचे होणार याची खात्री त्यांनी केली पाहिजे. केलेले रस्ते पहिल्या पावसात वाहून जाणार नाहीत आणि त्यावर खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. जर असे झाल्यास संबंधित अभियंत्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. ∙∙∙

पदरमोड करून मोहीम फत्ते...

म्हापसा पोलिसांनी ‘नास्नोडकर ज्वेलर्स’ दुकानातील चोरीचा छडा लावल्यानंतर सध्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण कोट्यवधी रुपयांचा ऐवज हस्तगत करून आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्याची मोठी आव्हानात्मक मोहीम पोलिसांनी फत्ते केली आहे. परंतु पडद्यामागे पोलिसांना मोहिमेवर येणाऱ्या अडथळ्यांचा विशेषतः आर्थिक बाबींकडे कुणीच लक्ष देत नसतो. पोलिसांना कोणताही अतिरिक्त निधी विभागाकडून मिळत नसतो. अशावेळी पोलिसांना खबऱ्यांपासून वाहतूक व इतर गोष्टींवर खिशातून पैसे खर्च करावे लागतात आणि हा आकडा बराच मोठा असतो. आता पोलिसांनी इतकी मोठी मोहीम फत्ते केली असल्याने किमान गृह खाते या पोलिस पथकास काही खुशाली म्हणून बक्षीस देते की नाही हे पाहावे लागेल. तसेही अनेकदा पोलिसांना राज्याबाहेर मोहिमेवर स्वतःचीच पदरमोड करावी लागते हे दुखणे जुने आहे. ∙∙∙

आडमुठी मागणी

रोमी कोकणीला राजभाषा कायद्यात समान दर्जा द्यावा, त्‍याचबरोबर रोमी लिपीतील कोकणी पुस्‍तके साहित्‍य अकादमी पुरस्‍कारासाठी पात्र ठरवावीत, अशी मागणी करून ग्‍लोबल कोकणी फोरमच्‍या नावाखाली काहीजणांनी चळवळ हाती घेतली आहे. मात्र, साहित्‍य अकादमीने यापूर्वीच ‘एक भाषा एक लिपी’ हे तत्त्व मान्‍य केल्‍यामुळे आणि या त्‍यांच्‍या निर्णयावर कर्नाटकातील उच्‍च न्‍यायालयानेही शिक्‍कामोर्तब केल्‍याने जोपर्यंत नवीन कायदा केला जात नाही, तोपर्यंत रोमी कोकणीतील साहित्‍याला साहित्‍य अकादमीची मान्‍यता मिळणे कठीण आहे. रोमी लिपीतील कोकणी पुस्‍तकांचे देवनागरीत रूपांतर केले तरच त्‍यांना हे पुरस्‍कार मिळू शकतात. मात्र, कायद्याची कुठलीही माहिती नसताना ग्‍लोबल कोकणी फोरमचे पदाधिकारी आपली मागणी पुढे रेटत आहेत. असे म्‍हणतात, झोपी गेलेल्याला कुणीही जागे करू शकतात, पण झोपेचे सोंग घेऱ्यांना कोण कसे बरे जागे करणार? ∙∙∙

ई - बसेसचा आधार

इमेजीन पणजी स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत राजधानीतील कामांमुळे लोक हैराण झालेत. त्यात निकृष्ट दर्जाचे काम केल्याची टीका झाल्याने हा प्रकल्प ‘फेल’ ठरल्याची चर्चा सुरू झाली, परंतु बुडणाऱ्याला काडीचा आधार अशी म्हण असून स्मार्ट सिटी प्रकल्पाला ई - बसेसच्या स्वरूपात दिलासा मिळाल्याचे दिसते. पणजी, बांबोळी, दोना पावला येथे प्रवास करणाऱ्यांसाठी या बसेस वरदान ठरल्याचे दिसते. खास करून महिला आणि ज्येष्ठांची या बसगाड्यांमुळे चांगली सोय झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पविरोधात असलेला राग थोडा कमी झाला, पण पुढे जाऊन या बसेस कुणाच्याही दबावाखाली बंद पडणार नाहीत, याची खात्री सरकारने केली पाहिजे अशी चर्चा रंगली आहे. ∙∙∙

बाबू पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत

केपेचे बाबू कवळेकर यांनी २०२७ मधील निवडणुकीसाठी कंबर कसली की काय? अशी चर्चा सध्या केपे मतदारसंघात सुरू झाली आहे ती त्यांनी विकासकामांबाबत आमदार एल्टन यांना दिलेल्या आव्हानांमुळे. एल्टन यांनी स्वतः प्रस्ताव सादर करून व पाठपुरावा करून किती प्रकल्प कार्यान्वित केले त्याची यादी सादर करण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले बाबू आता पुन्हा विधानसभेसाठी सज्ज होत असल्याचेच त्यांचे हे आव्हान उदाहरण मानले जात आहे. एकंदर सरकारी यंत्रणा ज्या पध्दतीने चालते ते पाहिले तर अडीच वर्षात एखादा प्रस्ताव तयार करून तो मंजूर करून साकारणे हे तसे पाहिले तर कठीण मानले जाते. त्यामुळे एल्टन हे ज्या कामांचे श्रेय प्रसिध्दी माध्यमांतून घेत आहेत ते प्रस्ताव आपण मंजूर करून घेतले होते असा बाबूंचा दावा वरकरणी खरा मानला तरी बहुतेक मतदारसंघांचेही हेच आहे असे म्हटले जाते. मग अन्य ठिकाणी जे कोणी अशा कामांबाबत दावा करतात तोही असाच पोकळ की काय असा मुद्दा उपस्थित होतो. मात्र, या निमित्ताने बाबूंची केपेतील सक्रियता दिसून येते हे मात्र नक्की. ∙∙∙

सनबर्नवरून ताप

सध्या बार्देशमधील राजकारण्यांसमोर एक मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. कामुर्ली येथे होऊ घातलेल्या सनबर्नविषयी आपले मत काय असे विचारल्यावर काय उत्तर द्यावे याची विवंचना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. कोणत्याही विषयावर बिनधास्त मत व्यक्त करणारे राजकारणीही हातचे राखून या विषयावर बोलू लागले आहेत. जो तो कामुर्लीवासीयांच्या खांद्यावर बंदूक ठेवू पाहात आहे. ग्रामस्थ ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सोयीस्कर उत्तर दिले जात आहे. सध्या स्थानिक पातळीवर सनबर्नविषयक भावना व्यक्त होत आहेत. सभा, बैठकांचे आयोजन होत आहे. राज्य पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते कामुर्लीतील सनबर्नबाबत पोटतिडकीने बोलताना दिसलेले नाहीत. यामागे कोणते बरे कारण असावे हा प्रश्नच आहे. कामुर्लीच्या सनबर्नने मात्र अनेकांची बोलती बंद केली आहे हेही तितकेच खरे असल्याची कोपरखळी या निमित्ताने ऐकू येऊ लागली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे म्हटले आहे, तर अभियंत्यांची बदली केली जाणार असल्याचे स्पष्ट केले, परंतु रस्त्यांची स्थिती पुन्हा अशी होणार नाही याची जबाबदारी निश्चित केली जाईल की पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार?
खरी कुजबुज: लोबोंच्या दोरीउड्या...

मांद्रेतील त्‍या तक्रारीचे झाले काय?

मांद्रे पोलिस स्थानकात मांद्रे येथील एका मंदिरात पुरुष आणि महिलांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार एका महिलेने केली होती. आता या तक्रारीचे काय झाले हेच कळत नसल्याने या महिलेने पोलिसांवर पैसे घेऊन आपल्याला हवे ते निर्णय घेत असल्याचा आरोप करायला सुरवात केली आहे. ज्यांनी या महिलेला मारहाण केली, त्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ देखील आहे. या तक्रारीचे काय झाले हे किमान पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तरी लोकांना सांगायला हवे होते, असा सूर स्‍थानिकांत ऐकू येत आहे. पोलिस मला माहिती देत नाही असा आरोप या महिलेने केल्‍याने पोलिसांनी पत्रकार परिषदेतर्फे लोकांना त्‍या तक्रारीची माहिती दिली, तर अनेक प्रश्‍न सुटतील असे आता लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com