Goa Revolution Day: भावा तुका याद आसा 18 जून? गोवा क्रांतिदिन उद्देश आणि महत्व

गोव्यात दरवर्षी 18 जून हा दिवस मुक्तिसंग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
Goa Revolution Day
Goa Revolution DayDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Revolution Day: "उदक लेगीत जाल्लें रगत आनी रगत जाल्लें हून, भावा तुका याद आसा अठरा जून ?" ही मनोहर राय सरदेसाई यांची कविता, 18 जून 1946 हा गोव्याच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला एक अविस्मरणीय दिवसाची आठवण करून देते.

याच दिवशी महान समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी क्रूर पोर्तुगीज सालाझारच्या वसाहतवादी राजवटीविरुद्ध गोमंतकांमध्ये संघर्षाची भावना जागृत केली. गोव्यात दरवर्षी 18 जून हा दिवस मुक्तिसंग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

'गोवा भारताचा अविभाज्य भाग असून त्याच्या स्वातंत्र्याशिवाय भारताचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे.' असे डॉ. लोहिया म्हणायचे. पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीखाली असलेल्या गोव्यात डॉ. लोहिया आले आणि त्यांनी गोमन्तकीयांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली.

डॉ. राम मनोहर लोहिया यांना गोव्याच्या मुक्तीसंग्रामचे प्रणेते म्हटले जाते. 10 जून 1946 रोजी असोळणा येथील त्यांचे मित्र डॉक्टर ज्युलियांव मिनेझिस यांच्या भेटीसाठी डॉ. राम मनोहर लोहिया गोव्यात आले. पोर्तुगीज दडपशाही विरोधात उठाव करण्याचा निर्णय लोहिया यांनी घेतला. 

गोवा मुक्ती संग्रामातील डॉ. लोहिया यांच्या भूमिकेमुळे गोवा मुक्ती संग्राम संपूर्ण भारताचा लढा बनला. गोवा मुक्तिसंग्रामात देशाच्या चारही दिशांमधून विविध लोक सामील होऊ लागले. डॉ. लोहिया यांनी वाराणसी येथून गोवा मुक्ती संग्रामाचे आंदोलन देशव्यापी करण्याची हाक देत 'चलो गोवा'चा नारा दिला. 18 जून 1946 रोजी मडगाव येथे सभेची घोषणा झाली.

Goa Revolution Day
18 जून: लोकशाहीत नागरी स्वातंत्र्याचे स्मरण

18 जून 1946 रोजी डॉ. लोहिया यांच्या सभेला हाजारो नागरिक गोळा झाले होते. लोहिया भाषणाला सुरूवात करणार एवढ्यात त्यांना पोर्तुगीज पोलिसांनी भाषण करण्यापासून रोखलं आणि एका गाडीत डांबून नेले. लोहिया यांचे भाषण झाले नाही पण, या सभेनंतर लोकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग जागे झाले.

महात्मा गांधी यांनी देखील ‘हरिजन’मध्ये डॉ. लोहिया गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी करत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले होते.

18 जूनचा उठाव पोर्तुगीज वसाहतींच्या 436 वर्षांच्या काळात गोमंतकीयांना प्रामुख्याने नाकारण्यात आलेल्या नागरी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी होता.

Goa Revolution Day
Goa Libration: नाहीतर 'गोवा' आज एक स्वतंत्र 'देश' असता; ती एक भेट झाली नाही अन्...

त्यांनी या दिवशी मोकळेपणाने बोलण्याचा, मोकळेपणाने विचार करण्याचा आणि स्वतंत्रपणे लिहिण्याचा अधिकार मागितला आणि त्या काळातील लोकांनी स्वतःचा जीव आणि स्वातंत्र्य धोक्यात घालून त्यांना मनापासून पाठिंबा दिला. पोर्तुगीजांनी 18 जूनच्या चळवळीला एक ‘मूव्हमेंत दा रुआ (रस्त्यांची चळवळ)’ म्हणून कमी लेखले.

दरम्यान, लोहियांच्या अटकेनंतर गोमंतकीय जनता पेटून उठली. पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होऊ लागला. जून 1961 मध्ये हा संघर्ष अधिक तीव्र झाला. अखेर भारतीय लष्कराच्या तिन्ही तुकड्यांनी 'ऑपरेशन विजय' करून 19 जून 1961 रोजी गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com