
पणजी: शिरगावच्या श्रीदेवी लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरी प्रकरणानंतर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या पदावरून हटवण्यात आलेल्या आयएएस अधिकारी डॉ. स्नेहा गीते यांची १६ मे रोजी अरुणाचल प्रदेशात बदली जाहीर करण्यात आली होती.
मात्र दोन महिने उलटून गेले तरीही राज्य प्रशासनाने त्यांना अद्याप सेवेतून मुक्त केलेले नाही, ही बाब आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
डॉ. गीते यांची जिल्हाधिकारी पदावरून हलवून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या संचालकपदी तात्पुरते नेमण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानुसार त्यांची अरुणाचल प्रदेश या केडरमध्ये बदली करण्यात आली. परंतु, नियमानुसार राज्य शासनाने त्यांना वेळेत सेवा मुक्त करून नवीन कर्तव्यावर जाण्यास संधी द्यायला हवी होती, ती प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे.
एकीकडे चेंगराचेंगरीसारख्या गंभीर घटनेनंतर जबाबदारी निश्चित करताना तत्काळ कारवाई केल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाने, दुसरीकडे डॉ. गीते यांना नव्या सेवेसाठी सोडण्यास दोन महिने उशीर लावल्याने प्रशासकीय दुटप्पीपणा स्पष्ट दिसून येतो, अशी टीका सत्ताविरोधकांतून होत आहे.
नियम हे निवडक व्यक्तींनाच का? अशी भावनाही सरकारी वर्तुळात व्यक्त होत आहे. केंद्रसेवेतील अधिकाऱ्याच्या बदलीनंतर राज्याने वेळेत प्रक्रिया न केल्यास, त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ही जाणीव प्रशासनाला नसेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.