खाण व्यवसाय सुरू करताना डिचोलीत शेतकरी आणि कामगारांवर अन्याय झाला आहे. स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्नही सुटलेला नाही. जमिनींचे बेकायदेशीरपणे रूपांतरण होत आहे, अशी खंत गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त करून या प्रश्नांसह डिचोलीतील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या विधानसभेत मांडणार असे सांगितले.
गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे डिचोलीत आयोजित ‘जनता दरबार’मध्ये जनतेच्या समस्या आणि गाऱ्हाणी ऐकून घेतल्यानंतर सरदेसाई बोलत होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. पिळगाव, मये, साळ आदी भागातील मिळून शंभरहून अधिक लोक यावेळी उपस्थित होते. त्यात वंचित खाण कामगार आणि शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, संतोषकुमार सावंत आदी नेतेही उपस्थित होते.
डिचोली खाण ब्लॉक-एकअंतर्गत येणाऱ्या ‘वेदान्ता’ कंपनीकडून डिचोलीत खाण व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. मात्र तो सुरू करताना आमच्यावर पूर्णपणे अन्याय झाला आहे. कंपनीने आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. याबाबत सरकारकडूनही आता कानावर हात ठेवण्यात येत आहेत, अशी व्यथा कामावरून काढलेल्या कामगारांच्या वतीने नीलेश कारबोटकर, किशोर लोकरे यांनी मांडली.
तर, आमची मालमत्ता आणि शेती उद्ध्वस्त करून खाण व्यवसाय सुरू झाला आहे, अशी खंत पिळगावमधील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. चोडण-रायबंदर जलमार्गावरील फेरीसेवा दिवसेंदिवस कोलमडत असल्याचा मुद्दा श्रीकृष्ण हळदणकर व नागरिकांनी मांडला. काँग्रेसचे नेते मेघश्याम राऊत यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींच्या नातलगांकडून दादागिरी सुरू आहे. विकासकामेही निकृष्ट दर्जाची होत आहेत.
पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनीही ‘जनता दरबार’ला उपस्थिती लावली. बेकायदेशीरपणे खाण व्यवसाय कसा सुरू आहे. खाणीमुळे मये, शिरगाव आणि मुळगाव येथील नैसर्गिक तळ्यांचे अस्तित्व कसे धोक्यात आले आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
बेकायदेशीरपणे खाण व्यवसाय असाच सुरू राहिल्यास गाव पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. खाण व्यवसायामुळे यापूर्वी डिचोलीसह मुळगाव भागात घडलेल्या दुर्घटना त्यांनी सरदेसाई यांच्या निदर्शनास आणून दिल्या. समाजसेवक स्वपेश शेर्लेकर यांनीही बेकायदेशीर खाणींसंदर्भात आपले मत मांडले.
देवाशी बोलणारे आमदार म्हणून चर्चेचा विषय ठरलेले दिगंबर कामत यांच्याशी आता देव पुन्हा बोलू लागला आहे आणि म्हणूनच त्यांना दुसऱ्यांना कोणती स्वप्ने पडतात त्याचा साक्षात्कार होत असावा, असा टोमणा विजय सरदेसाई यांनी मारला. कामत यांचे वय झाले असून, त्यांनी आता स्वतःचे डोके ठिकाणावर आहे का, हे तपासून घ्यावे. नावासमोर ‘डॉक्टर’ ही पदवी लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांचीही त्यांनी मदत घ्यावी, असा सल्लाही सरदेसाई यांनी दिला आहे. कामत यांनी केलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या विधानावर ते बोलत होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.