

पणजी: हडफडे येथील 'बिर्च बाय रोमिओ' (Birch by Romeo) या क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणावरुन आता राजकारण तापू लागले असून गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. या संपूर्ण प्रकरणाची दंडाधिकारी (Magisterial) चौकशी म्हणजे केवळ एक फार्स असून आगामी विधानसभा अधिवेशनात आपण या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची (Judicial Inquiry) मागणी करणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर संपूर्ण दोष हडफडेच्या सरपंचावर टाकण्यात येत आहे, याबद्दल विजय सरदेसाई यांनी आश्चर्य व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "या संपूर्ण घटनेत केवळ सरपंचाला जबाबदार धरले जाणे हे अत्यंत विचित्र आहे. पंचायत ही सरकारद्वारे नियुक्त केलेली एक संस्था आहे. मग सर्व जबाबदारी केवळ त्यांच्यावरच कशी काय टाकता येईल? या गुन्ह्यात पोलीस काय करत होते? केवळ एका व्यक्तीला बळीचा बकरा बनवून सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही."
गोवा (Goa) सरकारच्या निष्क्रीयतेमुळे आणि अद्यापही न्याय न मिळाल्यामुळे या आगीच्या घटनेतील पीडित कुटुंबीयांना दिल्लीत जाऊन निदर्शने करावी लागत आहेत. यावर भाष्य करताना सरदेसाई म्हणाले, "पीडित कुटुंबीयांना न्याय देण्यात गोवा सरकार अपयशी ठरल्यामुळे त्यांना दिल्लीत आपल्या न्यायासाठी बसावे लागले आहे. आपल्याच राज्यातील नागरिकांना दिल्लीत जाऊन आंदोलन करावे लागणे, ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. या कुटुंबीयांचा आवाज मी विधानसभेत बुलंद करणार आहे."
विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी सध्या सुरु असलेल्या दंडाधिकारी चौकशीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, ही चौकशी निव्वळ धूळफेक आहे आणि मुख्य गुन्हेगारांना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. खरी सत्यता बाहेर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी होणे काळाची गरज आहे, असे ठामपणे त्यांनी मत मांडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.