

डिचोली: मागील दोन दिवसांपासून कर्नाटकमधून भाजी पुरवठा झाला नसल्याने बुधवारी डिचोलीच्या आठवडी बाजारात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला. सायंकाळी तर बाजारातून भाज्या गायब झाल्या होत्या. भाज्यांच्या तुटवड्यामुळे सायंकाळी भाजी खरेदीसाठी बाजारात आलेल्या बहुतेक ग्राहकांना नाराज होऊन परतावे लागले. मात्र, इतर भाज्या नसल्यामुळे कांदे-बटाट्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त (Diwali) दोन दिवस बेळगावमधील भाजी मार्केट बंद राहिल्याने आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे भाज्यांचा पुरवठा झाला नाही. परिणामी डिचोलीत भाज्यांचा तुटवडा दिसून आला. ज्या विक्रेत्यांजवळ भाजी उपलब्ध होती, ती कमी प्रमाणात होती. त्यामुळे सायंकाळी भाजी संपली. भाजी उपलब्ध नसल्याने बहुतेक विक्रेत्यांनी दुपारीच गाशा गुंडाळला. बाजारातही तशी कमीच वर्दळ दिसून येत होती. दरम्यान, तुटवड्यामुळे भाज्या महाग होण्याची शक्यता आहे.
भाज्यांच्या तुटवड्यामुळे फ्लॉवरसह काही भाज्या किंचित महाग झाल्या होत्या. त्यातल्या त्यात हिरवी मिरचीचा भाव वाढला होता. १६० रुपये किलो या दराने ही मिरची विकण्यात येत होती. नियमित भाज्यांचा पुरवठा झाल्यानंतरच भाज्यांचे दर स्थिर होणार आहेत. मात्र, दोन दिवसांपासून भाजी पुरवठा बंद राहिल्याने त्यातच पावसामुळे भाज्या महाग होण्याची शक्यता आहे, तसे संकेतही काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.