

डिचोली: जीवघेणा ठरलेल्या डिचोलीतील वाठादेव बंधाऱ्यावर अखेर आंघोळीसाठी बंदी घालण्यात आली आहे. जलस्रोत खात्यातर्फे तसा सूचनावजा इशारा देणारा फलकही बंधाऱ्याजवळ लावण्यात आला आहे.
सूचना फलक लावल्यापासून या बंधाऱ्यावर आंघोळ करण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आले आहे. या बंधाऱ्यावर आंघोळ करण्यासाठी येणारे आता बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने सुरक्षित ठिकाणी आंघोळ करतात, अशी माहिती मिळाली आहे.
हा बंधारा बांधल्यापासून गेल्या महिन्यातील घटना मिळून आतापर्यंत या बंधाऱ्याने एका शाळकरी मुलासह चारजणांचे बळी घेतले आहेत. यावरून हा बंधारा आंघोळीसाठी असुरक्षित आणि धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बंधारा जीवघेणा असला, तरी अधूनमधून खासकरून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी येथे गावाबाहेरील लोकांचा गजबजाट दिसून येत होता.
लहान मुलांचा बंधाऱ्यावरील वावर तर चिंताजनक होता. आंघोळीसाठी हा बंधारा ‘कर्दनकाळ’ असल्यामुळे स्थानिक वाठादेव भागातील कोणीच या बंधाऱ्यात उतरण्याचे धाडस करीत नाहीत. बंधाऱ्यात आंघोळ करण्यास स्थानिकांनी मज्जाव केला, तर आंघोळीसाठी येणाऱ्यांकडून दादागिरी करण्यात येत होती.
बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खोल
डिचोली तालुक्यातील साखळी, कुडचिरे आदी काही ग्रामीण भागात जलस्रोत खात्यातर्फे लहान बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी काही बंधारे आंघोळीसाठी आकर्षित करतात. गेल्या दहा-बारा वर्षांपासून वाठादेव बंधारा आंघोळीसाठी चर्चेत आला आहे.
कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात येणारा ‘वाठादेव’ बंधारा मात्र आंघोळीसाठी असुरक्षित बनला आहे. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खोल असून, ज्याठिकाणी आंघोळ करतात, त्याठिकाणी पंप हाऊस असून, मोठे पाईप बसवून बंधाऱ्यातील पाणी खेचण्यात येत आहे.
या बंधाऱ्यावर सुरक्षेच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. नाही म्हटले तरी, बंधाऱ्यात आंघोळ करू नये, अशा आशयाचे सूचना फलक जलस्रोत खात्यातर्फे काही वर्षांपूर्वी या बंधाऱ्याजवळ लावण्यात आले होते. मात्र, हे सूचना फलकही गायब झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.