वाळपई, अनेक प्रकरणांमधील खटले न्यायालयात बरीच वर्षे प्रलंबित राहतात. काही प्रकरणांत कायदेशीर प्रक्रियांमुळे गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे एखाद्या कुटुंबाला बरेच परिश्रम, धावाधाव करावी लागते. मानसिक त्रासही होेतो.
सध्याच्या ताणतणावाच्या काळात सकारात्मक विचारांतून दाेन्ही वकिलांनी मध्यस्थी करणे, हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे, असे प्रतिपादन ॲड. राजन सावईकर यांनी केले.
सत्तरी तालुका कायदा सेवा समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाळपई न्यायालयाचे न्यायाधीश वसीम रिझवी, सत्तरी कायदा सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. यशवंत गावस, ॲड. हर्षदा हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ॲड. हर्षदा हळदणकर म्हणाल्या की, वेळ व पैसे वाचवण्यासाठी अशिलांनी पुढे येऊन मध्यस्थीचा मार्ग निवडला तर अनेक खटले संपुष्टात येतील. न्यायाधीश वासीम रिझवी यांनीही विचार मांडले. यावेळी वकील मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खर्च आणि वेळ वाचतो!
ॲड. सावईकर म्हणाले की, मध्यस्थी केल्यामुळे वकिलांचा आणि अशिलांचाही बराच वेळ आणि खर्च वाचतो. त्यात दोन्हीही पक्षांचा फायदा होतो आणि दोघांनाही खटला जिंकल्याचा आनंद मिळतो. कायदेशीर प्रक्रियेतही मध्यस्थीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. प्रशिक्षित मध्यस्थाद्वारे कायदेशीर प्रलंबित खटल्यात मध्यस्थी घडवून आणली जाते, असेही ते म्हणाले.
वकिलांनीही पुढे यावे!
महाभारत काळापासून मध्यस्थी प्रक्रिया अस्तित्वात आहे. कौरव आणि पांडवांमध्ये श्रीकृष्णाने मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून न्यायाधीश तसेच प्रशिक्षण देऊन काही वकील मध्यस्थ म्हणून नियुक्त केले आहे.
जर दोन्ही पक्षकारांनी खटला मध्यस्थाद्वारे सुटावा, अशी विनंती केल्यास खटला मध्यस्थाद्वारे सोडविणे शक्य आहे. त्यासाठी वकिलांनी पुढे यावे, असे सावईकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.