

सत्तरी: सत्तरीत रविवारी (22 फेब्रुवारी) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सातत्याने वाढणाऱ्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काजू बागायतदारांसमोर मात्र मोठे संकट उभे राहिले आहे. विशेषतः साट्रे आणि परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे काजू पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सत्तरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. सकाळपासूनच प्रखर ऊन आणि दुपारनंतर वाढणारा प्रचंड उकाडा यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. हवेत आर्द्रता वाढल्याने पावसाची चिन्हे दिसत होतीच. अखेर आकाशात ढगांची गर्दी झाली आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. साट्रे, वाळपई आणि लगतच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता.
सध्या सत्तरी (Sattari) तालुक्यात काजूचा हंगाम ऐन भरात आहे. अशा संवेदनशील काळात पाऊस पडल्यास काजूच्या मोहोरावर 'टी-मॉस्किटो' या कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तसेच, पावसाच्या पाण्यामुळे मोहोर काळा पडून गळण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे काजू बी डागाळण्याची शक्यता असते, ज्यामुळे बाजारात या काजूला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे बागायतदारांनी आपल्या पिकाची काळजी घेण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.