पणजी, राज्यात गेले कित्येक दिवस उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज सकाळपासून राजधानी पणजीसह राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपले.
राजधानी पणजी तर यंदाच्या हंगामातील पहिल्याच अवकाळी पावसाच्या दणक्याने जलमय झाली. स्मार्ट सिटीमध्ये पाणी तुंबल्याने ‘ये सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’, अशी खोचक टीका विरोधकांनी केली आहे.
अवकाळी पावसाने शनिवारी सकाळी पणजी शहराला झोडपून काढले. कदंब बसस्थानक परिसरात झाडे पडली, तर कांपाल परिसरात रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. मध्य पणजी आणि कदंब बसस्थानक परिसरातील गटारे तुंबल्याने रस्त्यावर साचलेले पाणी दुकानांमध्ये शिरले. पाटो परिसरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अवघ्या तीन तासांच्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा पणजी शहरात पाणी साचू नये म्हणून केलेल्या उपाययोजनांच्या मर्यादा उघड केल्या आहेत.
शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान
शनिवारच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गालाही नुकसानीला सामोरे जावे लागले. सुकविण्यासाठी घातलेल्या मिरच्या पावसाने ओल्या झाल्या. दमट हवामानामुळे त्या परत लवकर सुकणे कठीण होणार आहे.
सुकलेल्या अळसांदे आणि चवळीच्या शेंगा पूर्णत: भिजल्याने त्यातील दाणे तांबूस-काळे पडतात. त्यामुळे पिकाला योग्य तो भाव मिळत नाही. तसेच शेतात तयार झालेले भुईमुगाचे पीक अद्याप न काढल्याने शेंगा खराब होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.
‘पिक्चर अभी बाकी है!’
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, हा फक्त गोव्यातील राजधानी पणजीत स्मार्ट सिटी आणि भाजप सरकारच्या अमृत मिशनअंतर्गत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या विकासाचा ‘ट्रेलर’ आहे.
‘पिक्चर अभी बाकी है!’, अशा शब्दांत सरकारची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इमॅजिन पणजी आणि भाजपचा हाच विकसित भारत आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
कामांबाबत स्पष्टता नाही
पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील, असे सरकार तसेच आमदारांनी सांगितले असले तरी त्यापैकी कोणती कामे पूर्ण होणार, याविषयी स्पष्टता नसल्याची टीका उत्पल पर्रीकर यांनी केली आहे. मळ्यातील काम संपणार की, सांतिनेजमधील काम संपणार काय, हे स्पष्ट नाही, असा प्रश्न त्यांनी केला. सायंकाळी पणजीतील कामांची उत्पल पर्रीकर यांनी पाहणी केली.
मराठवाड्याकडून उत्तर कर्नाटक परिसरात ट्रफ्स सरकत आल्याचे निदर्शनास आले होते. या ट्रफ्सच्या प्रभावामुळे आज राज्यात पावसाची पडला. राजधानी पणजीत सकाळी ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत ३.६९ इंच इतक्या पावसाची नोंद झाली.
- डॉ. राजश्री, वैज्ञानिक, गोवा वेधशाळा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.