
सांगे: अवकाळी पावसाने विचुंद्रे-नेत्रावळीत धुमशान घातल्याने अनेक लहान-मोठ्या बागायतदारांना आर्थिक नुकसानी सहन करावी लागली तर अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावरील झाडे, फांद्या तुटून वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे वीज खात्याचे नुकसान झाले आहे.
संध्याकाळच्या वेळेस गडगडाटासह मुसळधार पावसासोबत जोरदार वारा आल्याने काहींच्या घरांचे पत्रे, कौले उडाल्याने तारांबळ उडाली तर देवरे भागात मुख्य रस्त्यावर झाडे पडून वाहतूक खोळंबली होती. स्थानिक युवक आणि कुडचडे अग्निशमन दलाने झाडे हटवून वाट मोकळी केली.
नेत्रावळीसारख्या ग्रामीण भागात दोन-दोन दिवसांत पाऊस पडण्याचे प्रकार सुरू झाले असून सोमवारचा पाऊस हा फारच त्रासदायक ठरला. अचानक हवामानात बदल होऊन गडगडाटी पावसासोबत वारा आल्याने बागायदारांना फटका बसला आहे. हर्षद प्रभदेसाई, सतीश देव, राणे, श्रीहरी कुराडे, विचुंद्रकर, सांगटू वेळीप, धनंजय भंडारी अशा अनेकांच्या बागायतीमधील केळी, पोफळी, आंबा, काजूची कलमे वादळात जमीनदोस्त झाली. अनेक बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. अनेकजण भातशेतीची कापणी करीत असताना पाऊस आल्याने शेतीचे नुकसान झाले.
नेत्रावळीतील विचुंद्रे येथे पावसापेक्षा वादळाचा तडाखा जास्त बसल्याने पडझड झाली. वादळाच्या झोतात अनेकांच्या घराची कौले, पत्रे उडून गेले. नागरिकांनी एकमेकांना सहकार्य केले असले तरी कृषी खात्याने नुकसानभरपाई त्वरित देणे आवश्यक आहे. बागायती उभ्या करण्यासाठी जितकी मेहनत घेण्यात येत असते तिचा मोबदला म्हणून दरवर्षी देण्यात येणारी सहानुभूती रक्कम एकदम नगण्य असल्यामुळे कृषी खात्याने नुकसानभरपाई देताना विचारपूर्वक देण्याची मागणी केली जात आहे.
नेत्रावळीत सतत दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीही (ता.८) वाऱ्या-पावसामुळे झाडांची पडझड झाली असून मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. स्थानिक युवक रस्ता मोकळा करण्यासाठी आपल्यापरीने परिश्रम घेत आहेत. अन्य भागात झालेले नुकसानाची माहिती अजून मिळू शकली नाही.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तसेच मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भागात समुद्रसपाटीपासून काही अंतरावर ट्रर्फ घोंघावत आहे, याच्या प्रभावातून राज्यातील काही भागात काही अंशी पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस तापमान वाढ व आर्द्रतेमुळे उष्मा जाणवण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यात मागील २४ तासांत सरासरी ०.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पणजी येथे २ मिमी, पाऊस पडला आहे.
आज पणजी येथे कमाल ३४.३ अंश सेल्सिअस तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल ८२ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ५ टक्के अधिक होती. पुढील दोन दिवस राज्यात उष्मा जाणवण्याची शक्यता असून कमाल ३५ तर किमान २६ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.