
Uday Bhembre Controversial Statement
मडगाव: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काल आपल्या घरी येऊन आपल्याला धमकावण्यामागे शिवाजी महाराजांचे प्रेम कमी आणि धर्मवाद, जातीयवाद अधिक होता, असा संशय आपल्याला येऊ लागला आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि विचारवंत उदय भेंब्रे यांनी व्यक्त केली.
भेंब्रे म्हणाले, ज्यावेळी बजरंग दलाचे हे कार्यकर्ते माझ्यावर आरोप करत होते, त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना विरोध करायला पाहिजे, असा त्यांचा राेख होता. वास्तविक मी मुख्यमंत्र्यांची कुठलीही बदनामी केली नव्हती. फक्त मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केले ते चुकीचे, असे मी म्हटले होते.
असे असतानाही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ते मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी केलेले वक्तव्य असे का वाटावे? यासाठीच मला त्यात धर्मवाद आणि जातीवादाचा अंश आहे असे वाटते.
मला जेव्हा ते प्रश्न विचारत होते त्यावेळी मी त्यांना उत्तरे देत होतो. पण माझी उत्तरे न ऐकता ते मला मध्येच अडवून परत परत मुख्यमंत्र्यांचीच बदनामी मी करतो, असे सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच त्यांचा फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून त्यामागून हिंदूंना भडकावण्याचा इरादा होता असे वाटत असल्याचे भेंब्रे म्हणाले.
शुक्रवारी (ता.28) पोलिस आल्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते मागे हटले; पण बराच वेळ ते माझ्या घरासमोरच रेंगाळत होते. ही कृती पाहिल्यास त्यांना माझा पुतळा तिथेच जाळायचा होता, असे वाटते. पण तेथे जमलेल्या लोकांची आणि पोलिसांची संख्या जास्त असल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विचार बदलून नंतर कुंकळ्ळीला जाऊन तो जाळला. सुरुवातीला मला त्यांच्याविरोधात तक्रारही करायची इच्छा नव्हती. मात्र, अशा प्रकारांची सरकारने दखल घ्यायला पाहिजे. आम्हाला या प्रकाराची कुणी कल्पनाच दिली नाही, असे म्हणायला सरकारला वाव असू नये यासाठीच आपण तक्रार देण्याचा निर्णय घेतला, असे उदय भेंब्रे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.