
मडगाव: वयोवृद्ध व्यक्ती असलेल्या एका माजी आमदाराला काहीजण रात्रीच्यावेळी त्यांच्या घरी येऊन धमकी देत असतील तर ती अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. वास्तविक ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत: भेंब्रे यांची भेट घेऊन याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नाेंद करण्याची आवश्यकता हाेती, अशी प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. सध्या कार्निव्हलचा उत्सव सुरू आहे. हा उत्सव संपल्यानंतर लगेच एक नागरी समिती स्थापन करून हा विषय पुढे नेणार, असे सरदेसाई यांनी सांगितले.
उदय भेंब्रे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे खंडन केल्यामुळे काल रात्री बजरंग दलाचे विराज देसाई यांनी भेंब्रे यांच्या घरी येऊन त्यांना धमकी देण्याची घटना घडली होती.
उत्तर प्रदेेशात जे कुणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतात त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडतात. मुख्यमंत्र्यांना गाेव्यातही तशीच संस्कृती पुरस्कृत करायची आहे का, असा सवाल करून गाेव्यात अराजक परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
शनिवारी सकाळी सरदेसाई यांनी उदय भेंब्रे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, भेंब्रे यांचा कुठलाही मुद्दा कुणाला पटला नसेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्याचे खंडन केले असते तर कुणाला काहीच वाटले नसते.
मात्र, रात्रीच्यावेळी येऊन एका ज्येष्ठ नागरिकाला अशाप्रकारे धमकावणे ही शुद्ध गुंडगिरी आहे. हा प्रकार मी प्रतिनिधीत्व करत असलेल्या फातोर्डा मतदारसंघात घडलेला आहे. या प्रकरणाची कडक दखल घ्यावी यासाठी मी पाेलिस महासंचालकांनाही फोन केला आहे. उदय भेंब्रे यांना सरकारने त्वरित संरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या घरासमोर शुक्रवारी रात्री जी घटना घडली त्याचा कोकणी भाषा मंडळाने निषेध केला असून, संशयितांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवार, २ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता चौगुले कॉलेज जंक्शन येथील सेंट सॅबेस्टीयनच्या खुल्या मैदानावर निषेध सभेचे आयोजन केले असून, यात पुढील कृती निश्चित करण्यात येणार आहे, असे कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष रत्नमाला दिवकर यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले.
यावेळी प्रकाश नाईक, रमेश कोमरपंत, दिनेश मणेरकर, निलबा खांडेकर व अन्य उपस्थित होते. गोव्यात शिवशाही होती आणि शिवाजी महाराजांनी गोव्यातील धर्मांतर रोखले, हे मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधान भेंब्रे यांनी खोडून काढले होते, त्याबाबत त्यांनी संदर्भही दिले होते. या त्यांच्या भूमिकेवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर निदर्शने केली होती. गोव्याच्या जडणघणीत उदय भेंब्रे यांचा सिहांचा वाटा आहे. लोकशाहीत आपली मते मांडण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. जर भेंब्रे यांच्या विचारांशी कुणाचे मतभेद आहेत तर त्या लोकांना भेंब्रेंना भेटून त्यावर चर्चा करता आली असती. मात्र, शुक्रवारी जे घडले ती हुल्लडबाजी होती. ८५ वयाच्या वयस्क माणसाला हा शाब्दिक व मानसिक त्रास देण्याची ही घटना होय, असे रत्नमाला दिवकर म्हणाल्या. सरकारने अजूनही संशयितांवर कारवाई केली नाही, त्यामुळे सरकारच्या हेतूवरही प्रशचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.