
पेडणे: चांदेल-हसापूर सरपंच तुळशीदास गावस यांच्याविरोधात एकूण पाच पंचसदस्यांपैकी चौघांनी सोमवारी (ता.२३) सकाळी पेडणे गट विकास कार्यलयात अविश्वास ठरावाची नोटीस दिली; तर त्याचवेळी गावस यांनी पंचायत संचालनालयाकडे पदाचा राजीनामा सादर केला.
‘अंतर्गत करारानुसार सरपंचपदासाठी अडीच वर्षांचा माझा कालावधी होता. त्यानुसार हा कालावधी संपल्याने मी आज पंचायत संचालनालयाकडे सरपंचपदाचा राजीनामा सादर केला,’ असे गावस यांनी सांगितले. तरीही तुमच्यावर अविश्वास ठराव का दाखल करण्यात आला, या प्रश्नावर ते उत्तरले- ‘माझ्यावर विश्वास ठराव संमत झाला, हे दाखवण्यासाठी हे राजकारण असावे.’
दरम्यान, अविश्वास ठरावाच्या नोटिसीवर रिमा अच्युत मळीक, ऋचिता मळीक, बाळा शेटकर व प्रज्योत मळीक या पंचसदस्यांच्या सह्या आहेत. सरपंच तुळशीदास गावस हे पंचायतीचा कारभार चालविताना पंचायत मंडळाला विश्वासात घेत नाहीत, हे नेहमीचे कारण देण्यात आले आहे.
मात्र, आमदार प्रवीण आर्लेकर विरुद्ध सरपंच तुळशीदास गावस यांच्यामधील सुप्त संघर्ष हे अविश्वास ठराव नोटिसीमागील खरे कारण असल्याचे बोलले जात आहे. तुळशीदास गावस हे पेडणे भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.
डिसेंबर २०२४मध्ये तुळशीदास गावस यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव नोटीस देण्यात आली होती. त्यावेळी बाळा शेटकर हे पंचसदस्य गायब झाले होते व अविश्वास ठराव चर्चेला येण्याच्या वेळी बाउन्सरच्या संरक्षणात ते गाडीतून उतरले असता त्यांना तुळशीदास गावस यांच्या समर्थकांनी ताब्यात घेऊन मतदारांना विश्वासात न घेता आपण परस्पर अविश्वास ठरावाला समर्थन कसे काय दिलात, याचा जाब विचारला होता. त्यावेळी चांदेल-हसापूर पंचायतीसमोर राडा झाला होता. नंतर तुळशीदास गावस यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला ठराव बारगळला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.