
सात-आठ सप्टेंबर रोजी गोव्यात खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. विद्यार्थ्यांना तसेच अंतराळ विज्ञानात रस असलेल्यांना सूर्यमाला आणि ब्रह्मांडातील गुपिते प्रत्यक्षात समजून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.
7 सप्टेंबर रोजी रात्री ८.५८ वाजता पृथ्वीची उपछाया (penumbral eclipse) चंद्रावर पडायला सुरुवात होईल व रात्री 11 वाजता पूर्ण चंद्र पृथ्वीच्या छायेने व्यापला जाईल. या काळात चंद्र लालबुंद दिसेल याचे कारण पृथ्वी भोवतालच्या वातावरणाचा थर, सूर्यकिरणांच्या सात रंगामधील लाल रंग परावर्तित करून चंद्रावर पाठवत असतो. त्यामुळे खग्रास चंद्र ग्रहणाला ‘ब्लड मून एक्लिप्स’ असेही म्हणतात. हे ग्रहण ८ सप्टेंबरच्या पहाटे २.२५ वाजता पूर्ण सुटेल.
सुरुवात ते शेवटपर्यंत तब्बल साडेपाच तास चालणारे हे ग्रहण आशिया, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडात जवळपास ६०० कोटी लोकसंख्येचा भाग व्यापणार आहे. ह्याच कारणासाठी वैज्ञानिक मंडळे आणि खगोलशास्त्र संस्था अभ्यासाच्या नजरेने या ग्रहणाकडे पाहण्याची एक मोठी संधी असे मानतात.
त्यांनी साऱ्या लोकांना कुठलीच भीती न बाळगता ही नैसर्गिक घटना आपल्या डोळ्यांनी अनुभवावी म्हणून हाक दिली आहे. भारत देश अंतराळ संशोधनात पुढे पावले टाकत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना या क्षेत्रात रस निर्माण व्हावा आणि त्यांना विज्ञान सोपेपणी समजून यावे म्हणून हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. चंद्रग्रहण निरखण्यासाठी दुर्बिण व इतर कुठल्याही उपकरणांची गरज नसते. सभोवताली काळोख असल्याने थोडीशी स्वसंरक्षणाची तत्त्वे पाळली गेल्यास ग्रहणाचा मनमुराद आनंद मिळू शकतो.
चंद्रग्रहणे तीन प्रकारची असतात- खग्रास (total), आंशिक (partial) आणि उपछाया (penumbral). हे तीनही प्रकार या खेपेस अनुभवायला मिळतील. चंद्रग्रहणांचे वैशिष्ट्य म्हणजे ती सूर्यग्रहणापेक्षा नेहमीच अधिक वेळ चालतात. पौर्णिमेला किंवा अमावास्येला चंद्रग्रहण येत नाही कारण पृथ्वी आणि चंद्राची फिरण्याची तिरकस कक्षा. कक्षा जेव्हा सूर्याबरोबर सरळ पातळीवर येते तेव्हाच ग्रहणे उद्भवतात. कुठल्याही चंद्रग्रहणाबरोबर एक किंवा दोन सूर्यग्रहणे असतातच. ती साधारण पंधरवड्याच्या अंतरात येतात. पुढील सूर्यग्रहण २२ सप्टेंबर रोजी आहे. मात्र ते गोव्यात दिसणार नाही.
चंद्रग्रहण ही एक वैज्ञानिक घटना आहे त्यातून कुठल्याही प्रकारची दोषबाधा होण्याची शक्यता नसते. यातील विज्ञान हे इतरांना सांगण्याचा प्रयत्न अवश्य व्हायला हवा. ग्रहणासंबंधी ज्या अंधश्रद्धेच्या घटना आहेत तो निव्वळ योगायोग असू शकतो. मानवनिर्मित वा नैसर्गिक विकृत घटना एरवीदेखील घडतात. त्यामुळे ग्रहणे वाईट म्हणण्याचे कोणतेही कारण नाही. भोंदूबाबा व कुठल्याही विचित्र गोष्टींवर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःच्या शिक्षणाचा आदर अवश्य राखावा.
गौतम जल्मी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.