
मडगाव : थिवी पठारावरील चिरेखाणीत आंघोळ करताना आकाश नाईक (३४) या पोलिस शिपायाचा बुडून मृत्यू झाला. गोव्यासारख्या लहान राज्यात प्रत्येक चौथ्या दिवशी एकाचा बुडून मृत्यू होत आहे.
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांपेक्षा ग्रामीण भागातील नद्या आणि अन्य जलस्रोतांचे आकर्षण लोकांसाठी अधिक धोकादायक बनू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्या साडेपाच महिन्यांतील बुडून मरण पावणाऱ्यांची संख्या ५१ वर पोहोचली आहे.
यातील जवळपास ५० टक्के मृत्यू हे ग्रामीण भागातील नद्यांतील आहेत. या आकडेवारीत नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्यांची संख्या जोडल्यास ही संख्या ६० ते ६५च्या आसपास पोहोचू शकते.
सासष्टीमध्ये सर्वाधिक बुडून मृत्यू
नद्या, जलस्रोतांमध्ये बुडणाऱ्यांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. तालुकावार मृतांची आकडेवारी पाहिल्यास सासष्टी तालुक्यात ती सर्वांत अधिक असून या तालुक्यात आतापर्यंत १३ जणांना बुडून मृत्यू आला आहे.
सासष्टीपाठोपाठ जर कुठल्या तालुक्याचा क्रमांक लागतो तर तो निसर्गरम्य परिसर असलेल्या धारबांदोडा तालुक्याचा. या तालुक्यात आतापर्यंत ११ जणांना बुडून मृत्यू आला असून या तालुक्यात येणाऱ्या उसगाव-गांजे या एकाच नदीवर चारजणांना बुडून मृत्यू आला.
दूधसागर नदीवर आतापर्यंत तिघेजण बुडून मृत पावले असून ओकांब येथील नदीने एक बळी घेतला आहे. बार्देश आणि केपे या दोन तालुक्यांत प्रत्येकी ६ जणांना बुडून मृत्यू आला आहे. फोंडा, तिसवाडी, काणकोण व पेडणे या तालुक्यांत प्रत्येकी ३ तर सत्तरी, डिचोली व मुरगाव या तालुक्यातील जलस्रोतांवर प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे.
समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक तैनात करण्यात आले असले तरी ग्रामीण भागातील जलस्रोतांवर अशी कोणतीही सोय नाही. काहीवेळा या जलस्रोतात किती पाणी आहे, याचा अंदाज न आल्याने बुडून मरण्याच्या घटना घडल्या आहेत. १ जून रोजी गांजे नदीवर अशीच दुर्घटना घडली होती.
नदीतील पाण्याची पातळी अगदीच कमी असल्याने गोव्याबाहेरून आलेले काही खेळाडू पाण्यात उतरले. मात्र, अचानक धरणाचे पाणी नदीत सोडल्याने नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा जोर वाढला आणि त्यात दोघेजण वाहून जाऊन त्यांना मृत्यू आला तर दोघांजणांना स्थानिक लोकांनी वाचविले.
मागच्या साडेपाच महिन्यांत गोव्यात किमान ८ लहान मुलांना बुडून मृत्यू येण्याच्या घटना घडल्या असून त्यात दीड वर्षाच्या मुलापासून ९ वर्षांच्या मुलापर्यंत समावेश आहे. यातील ३ मुलांना केपे भागातील कालव्यात पडून त्यांना मृत्यू आला. त्यातील २ सुमारे दीड वर्षाची मुले घरापासून जवळच असलेल्या कालव्याजवळ खेळता खेळता पाेचल्याने अपघाताने ती पाण्यात पडली.
तर अन्य एक ९ वर्षांची मुलगी पायाला लागलेली घाण धुण्यासाठी कालव्यात उतरली असता पाण्याच्या लोटाने ती वाहून गेली. आणखी तीन लहान मुलांचे अपघात असे आहेत की हॉटेलमधील स्विमिंगपूलमध्ये बुडाल्याने त्यांना मृत्यू आला. तर अन्य दाेन मुले पाण्याच्या डबक्यात बुडाल्याने त्यांना मृत्यू आला.
होळीच्या दिवशी म्हणजे १४ मार्च रोजी उसगाव-गांजे आणि शेळवण-केपे या दोन ठिकाणी झालेल्या दुर्घटनांत एकूण तिघांना मृत्यू आला होता. होळीचा रंग खेळून उसगाव-गांजे येथे नदीत दोघा युवकांना मृत्यू आला तर शेळवण येथे होळीनंतर पिकनिक करताना एकटा नदीत बुडाल्याने त्याला मृत्यू आला.
पर्यावरण चळवळीत सक्रिय असलेले प्रा. राजेंद्र केरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचारामुळे ग्रामीण भागातील जलस्रोत पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी आकर्षण बनू लागले आहेत. त्यामुळेच पिकनिकसाठी लोक अशा ठिकाणी येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. परंतु ग्रामीण भागातील पाण्याचे हे डोह लोकांसाठी मृत्यूच्या गुहा बनू लागल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.