
कोलवाळ कारागृहात जमीन हडप प्रकरणातील संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याची रवानगी केल्यापासून तसेच त्याने पोलिसांविरुद्ध केलेल्या आरोपामुळे पोलिस अधिकारी खवळून उठले आहेत. पोलिस अधिकारी असलेल्या कारागृहाच्या प्रमुखांनी आज अचानक कारागृहाची झाडाझडती घेतील. संशयित सुलेमान असलेल्या खोल्यांची कसून तपासणी केली असता तेथे पुन्हा एक मोबाईल संच सापडला आहे. मात्र, हा संच कोणाचा याचा पर्दाफाश झाला नाही. छापेमारीसाठी काही गोवा पोलिसांचा वापर केल्याची चर्चा तुरुंगरक्षकांमध्ये सुरू होती. संचचा शोध लावण्यासाठी संशयित सुलेमान याच्यासह इतर कैद्यांनाही पोलिसी हिसका दाखवण्यात आला. मात्र, त्यात यश आले नाही. कारागृहात मोबाईल तस्करी काही थांबलेली नाही. त्यामुळे हे अधिकारी हैराण झालेले आहेत. त्यावर एकमेव उपाय म्हणजे तेथे ‘जॅमर’ बसवणे होय. मात्र, त्यासाठी कोणीच प्रस्ताव का देत नाही हेच कोडे आहे. हे सापडलेले मोबाईल त्याचे होते का याची माहिती अधिकाऱ्यांकडून लपविली जाते. अधिकारी आपले अपयश झाकण्यासाठी कारागृहात घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची माहितीही जाणूनबुजून दडपण्याचे प्रकार करत आहेत. ∙∙∙
सरकारने तीनच दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलावून विरोधकांना राजकीय आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विरोधात केवळ सात आमदार असल्याने ३३ जणांचे मोठे बहुमत विधानसभेत असल्याने आम्ही ठरवू ते करू अशी सत्ताधारी मानसिकता यातून डोकावते आहे. विरोधी आमदारांनी सरकारच्या या कृतीविरोधात सध्या जाहीर वक्तव्ये करणे सुरू केले असले तरी लोकशाहीतील अन्य आयुधांचा वापर करून ते सरकारला जास्त दिवसांचे अधिवेशन घेण्यास कसे भाग पाडतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. ∙∙∙
फेस्टीव्हल ऑफ आयडियाजचे सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विचारवंत गौर गोपाल दास यांचे विचार ऐकण्यासाठी लांबवरून लोक आले होते. उद्घाटक म्हणून बोलताना मुख्यमंत्र्यांनी दास यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आलो आहात, माझे राजकीय भाषण ऐकवण्यासाठी खचितच नाही असे श्रोत्यांना सांगितल्यावर त्यांनी टाळ्या वाजवल्या. या टाळ्या माझ्या उत्कृष्ट भाषणासाठी नव्हे, तर भाषण बंद करण्यासाठी, असे मुख्यमंत्र्यांनी हसत हसत सांगत समयसूचकता दाखवली. त्यांच्या या खिलाडूवृत्तीची कार्यक्रमानंतर चर्चा झाली नाही तर नवलच. ∙∙∙
म्हापसा इस्पितळात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोमवारी अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे संपूर्ण गोव्यात चर्चा रंगली. म्हापसा इस्पितळात रुग्ण तपासणीची वेळ झालेली असताना दोन कर्मचारी मात्र दरवाजा बंद करून गप्पा मारण्यात मग्न होते. मंत्री आले, दरवाजा वाजवला, पण आतले साहेब-सााहेबिणी एवढ्या गप्पा मारण्यात व्यग्र होत्या की, दार उघडायलाही वेळ नव्हता! अखेर मंत्री महोदयांनीच दार ठोठावून ‘सेवाभावी काम करा, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ असा सज्जड दम दिला. यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये हलचल माजली आहे. ‘मंत्री कधी कुठे येतील, काही सांगता येत नाही!’ अशी चर्चा सरकारी दवाखान्यांत आता सुरू झाली आहे. ∙∙∙
सध्या कार्निव्हल हा सण तीन दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच बाणावलीच्या लोकांना अच्छे दिन आले असावेत असे वाटते. यावेळी किंग मोमो होण्याचा मान बाणावलीच्याच क्लीवन फर्नांडिस याला प्राप्त झालेला असताना बाणावलीचा सेलेब्रेटी मच्छीमार पेले फर्नांडिस हा सध्या कार्निव्हल ॲम्बेसिडर असल्यागत आपले व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करू लागला आहे. कार्निव्हलचे निमित्त फातोर्ड्यात तीन दिवसांचा मोठा उत्सव होत असतो. या उत्सवाला कित्येक सेलेब्रेटी असताना काही विदेशी मॉडेल्सना घेऊन सध्या पेले याच फातोर्डा कार्निव्हल ब्लास्ट कार्यक्रमाचा प्रसार करू लागले आहेत. पेलेचा यासंदर्भातील व्हिडिओ बराच लोकप्रिय होऊ लागला आहे. ∙∙∙
पर्यटकाने दिलेल्या कारच्या ठोकरीत स्थानिक महिला मरण पावल्यानंतर मांद्रेतील जनता आक्रमक पवित्र्यात आहे. त्या पर्यटकाची दादागिरी सुरू असताना त्याला त्या महिलेचे कुटुंबीय वगळता कोणी जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. किनारी भागात राज्य कोणाचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. किनारी भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे हे कोणी मान्य करणार नाही. त्यामुळेच की काय पर्यटकाला पोलिसांनी खासगी वाहनातून पोलिस ठाण्यात आल्यावर जाब विचारण्यास जनतेने मागेपुढे पाहिलेले नाही. ∙∙∙
मडगाव शहरात अंदाधुंदी चालली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या हातात नाही. जो तो येतो आणि रस्ते, मोकळ्या जागांवर अतिक्रमण करतो. त्यात स्थलांतरितांचा समावेश जास्तच आहे. न्यू मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी आपल्या मूळ जागांपुढे अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये चालायलासुद्धा जागा नाही. शिवाय जुनी दुकाने, घरे मोडून केवळ नगरपालिकेच्या मेहरबानीने त्याचे नूतनीकरण केले जात आहे. अशांना परवानासुद्धा दिला जात नाही व त्याचे शुल्क नगरपालिकेच्या तिजोरीत कमी आणि इतरांच्या खिशात जास्त जात आहे. त्यामुळे नगरपालिकेला नुकसान सोसावे लागत आहे व नगरपालिकेसमोर आर्थिक अडचण उभी ठाकली आहे. या बेकायदेशीर कृत्यांबद्दल कित्येकजण तक्रारी करतात, वर्तमानपत्रांत, समाज माध्यमांवर टीका टिप्पणी होत आहे. तरीसुद्धा नगरपालिकेतर्फे काहीही कारवाई केली जात नाही. सध्या मडगावमध्ये जिथे हॉटेल होते तिथे कपड्याचे दुकान थाटण्यात आले आहे. एरव्ही हे जुने घर. आतील सर्व भिंती पाडून मोठा हॉल करून व्यापार चालू केला आहे. याबद्दल तक्रारी केल्या जात आहेत. नगरपालिका काही कारवाई करील असे वाटत नाही. कारण नगरपालिकेने डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे. कशासाठी हे कुणालाही सांगणे न लगे.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.