

पणजी: स्मार्ट मीटर बसविल्यामुळे ग्राहकांना गरजेएवढीच वीज वापरता येणार आहे. महिन्याच्या वीज मीटर रिडिंग आणि बिलाद्वारे ग्राहकांना वीज वापराची तुलना करता येईल. तसेच वीज खंडित झाल्यास खात्याकडे तक्रार करण्याची गरज भासणार नाही, कारण वीज बिघाडाचे संकेत थेट नियंत्रण कक्षाकडे पोहोचतील. त्यामुळे ‘स्मार्ट मीटर’विषयी होत असलेल्या अपप्रचाराला बळी न पडता ग्राहकांनी ही सुविधा स्वीकारावी, असे आवाहन वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी केले.
यावेळी वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, अधीक्षक अभियंता मयूर हेदे व इतर अधिकारी उपस्थित होते. हेदे म्हणाले की, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काय परिणाम होतील, वीज बिले वाढतील का, असे प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्याशिवाय काही घटकांकडून स्मार्ट मीटरविषयी अपप्रचारही केला जात आहे. काही लोक त्याला विरोध करत असले, तरी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी सरकारकडून कोणताही अतिरिक्त पैसा आकारला जाणार नाही. ग्राहकांनी जितकी वीज वापरली, तेवढ्याच वापराचे बिल भरावे लागेल.
स्टिफन फर्नांडिस म्हणाले की, सध्याचे डिजिटल मीटर आणि नव्याने बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर यांच्यात काही प्रमाणात फरक आहे. स्मार्ट मीटरचा वापर ग्राहक ‘रिमोट कंट्रोल’प्रमाणे करू शकतो. त्यामुळे या प्रणालीबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मागणीचा विक्रम मोडला
गोव्याची विजेची कमाल मागणी ९९५ मेगावॅटच्या उच्चांकावर पोहोचली आहे. या मागणीने गेल्या वर्षीच्या सर्वाधिक मागणीचा विक्रम मोडला असल्याची माहिती वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. वाढते तापमान आणि उन्हाळ्यातील विजेचा वाढलेला वापर यामुळे ही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गोव्याची विजेची कमाल मागणी २०२२-२३ मध्ये ७१८ मेगावॅट होती. ती २०२३-२४ मध्ये ७७६ मेगावॅटपर्यंत वाढली आणि २०२४-२५ मध्ये आणखी वाढून ८१० मेगावॅटवर पोहोचली होती.
स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मीटर रिडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर सेवांमध्ये समाविष्ट केले जाईल. आवश्यक तेवढेच मीटर रिडर ठेवले जातील. कोणालाही सेवेतून कमी केले जाणार नाही. ‘पीएम कुसुम’ योजनेअंतर्गत गोव्यासाठी ७०० सौर पंपांना मंजुरी देण्यात आली आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय या योजनेची पुनर्रचना करत असून, येत्या १५ दिवसांत ती पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सुधारित योजना प्राप्त होताच ७०० सौर पंप उभारण्याचे काम सुरू होईल.
ग्राहकांनी मंजूर वीज भार वाढवून न घेतल्यामुळे घरगुती वीज बिले मोठ्या प्रमाणात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्राहकांनी वीज भार वाढवून घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असून, तो वाढवल्यानंतर ही समस्या सुटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या ग्राहकांचा वीज वापर मंजूर मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि नवीन विद्युत उपकरणे जोडूनही मंजूर क्षमता अद्ययावत करण्यात आलेली नाही, अशा ग्राहकांवर वीज विभागाने दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. गोव्यातील सुमारे ७.५ लाख वीज ग्राहकांपैकी आतापर्यंत सुमारे एक लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.