

पणजी: नोडल एजन्सीची नियुक्ती करून पुढील सहा महिन्यांत सांतिनेज खाडीची सफाई करून पाण्याचा प्रवाह कायम करण्याचा निर्णय बुधवारी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
राजधानी पणजीतील सांतिनेज खाडीत कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने पाणी साचून राहिलेले आहे. पाण्याचा प्रवाह होत नसल्याने साचलेले पाणी दुषित झालेले आहे. त्याचा फटका स्थानिकांना बसण्याची शक्यता असल्याने महापौर मोन्सेरात यांनी बुधवारी जलस्रोत, सार्वजनिक बांधकाम यांसह संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची बुधवारी पणजीत बैठक घेतली.
या बैठकीत नाल्याची सफाई करून पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. नोडल एजन्सीची नियुक्ती करून आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून हे काम पुढे नेण्याचे बैठकीत ठरल्याचे महापौरांनी सांगितले.
पणजी आणि आसपासच्या भागांत सांडपाणी सोडण्यासाठी वाट नाही. त्यामुळे नागरिक असे सांडपाणी सांतिनेज खाडीत सोडत आहेत. शिवाय घरातील कचराही त्यात टाकत आहेत. त्यामुळेच खाडीची बिकट अवस्था झालेली आहे. वाढत्या कचऱ्यामुळे खाडीत अनेक ठिकाणी पाणी साचून राहिलेले असून, ते दूषित झालेले आहे. त्यामुळे नाला ज्या–ज्या भागांतून वाहतो, त्या–त्या भागांची आपण प्रत्यक्ष पाहणी करणार आहे, असेही मोन्सेरात यांनी नमूद केले.
स्थानिकांच्या सहकार्याची गरज
सांतिनेज खाडीत स्वच्छतेची कामे सरकारी खात्यांनी याआधीही हाती घेतलेली होती. परंतु, त्यानंतरही खाडीत सांडपाणी सोडले जात असल्याने तसेच कचरा टाकण्यात येत असल्याने पुन्हा नाल्यातील पाण्याचा प्रवाह थांबलेला आहे. नाल्याच्या स्वच्छतेची जबाबदारी केवळ सरकारचीच नाही. स्थानिक नागरिकांनीही यासाठी सरकार आणि मनपाला आवश्यक ते सहकार्य करण्याची गरज आहे, असेही महापौर रोहित मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.