South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक
मडगाव: मागच्या २०२५ या वर्षाची २०२४ शी तुलना केल्यास या वर्षात दक्षिण गोव्यात रस्त्यावरील वाहन अपघातांत ५ टक्क्यांनी घट झाली असून अपघाती मृत्यूंचे प्रमाण ८ टक्क्यांनी कमी झाले आहे.
दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागचे २०२५ हे वर्ष रस्ता अपघातासंदर्भात दक्षिण गोव्याला काहीसे दिलासादायक ठरले असले तरी गंभीर जखमींच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. .
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील मोटार वाहन अपघात आणि मृत्यूंच्या विश्लेषणानुसार, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये दक्षिण गोव्यात मोटार वाहन अपघात आणि मृत्यूंमध्ये एकूण घट नोंदवली गेली.
उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये एकूण १,२३६ मोटार वाहन अपघात नोंदवले गेले, ज्यात २०२४ मधील १,३०१ अपघातांच्या तुलनेत ६५ प्रकरणांची घट दिसून येते. प्राणघातक अपघातांमध्येही घट झाली असून, २०२४ वर्षातील १२९ प्रकरणांच्या तुलनेत २०२५ मध्ये १२२ प्राणघातक प्रकरणे नोंदवली गेली. मृत्यूंची संख्या २०२४ मधील १३९ वरून २०२५ मध्ये १२८ वर आली, जी मृत्यूंमध्ये ७.९% घट दर्शवते.
मात्र, अहवालात गंभीर जखमींच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचे अधोरेखित केले आहे, जी २०२४ मधील १९९ प्रकरणांवरून २०२५ मध्ये २०५ प्रकरणांपर्यंत वाढली आहे. हे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले आहे.
प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यात समाविष्ट असलेल्या विविध वाहतूक पोलिस विभागांमध्ये, फोंडा आणि वास्को येथे तुलनेने अधिक अपघात आणि मृत्यूची नोंद झाली, तर दाबोळी येथे वर्षभरात सर्वात कमी घटना घडल्या. मडगाव वाहतूक विभाग एकूण अपघातांच्या आकडेवारीमध्ये सर्वात पुढे पहिल्या क्रमांकावर आहे.
वाहतूक पोलिसांच्या सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमा, नाकाबंदी, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर केलेली कारवाई, तसेच हेल्मेट आणि सीटबेल्ट वापराबाबत वाढलेली कडक अंमलबजावणी यामुळे अपघात आणि मृत्यूंच्या आकडेवारीत घट झाल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक वसाहती परिसरात राबविण्यात आलेल्या सुरक्षितता जनजागृती कार्यक्रमांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
दरम्यान, गंभीर जखमींच्या संख्येत झालेली वाढ ही चिंतेची बाब मानली जात असून, वेगमर्यादा उल्लंघन, मोबाइलवर बोलत वाहन चालवणे आणि रात्रीच्या वेळी बेदरकार वाहनचालकांची संख्या वाढणे ही संभाव्य कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आगामी वर्षात वेग नियंत्रणासाठी अधिक कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित वाहतूक निरीक्षण प्रणाली आणि अपघातप्रवण ठिकाणी सुधारित सूचना फलक लावण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
मागच्या सरलेल्या वर्षात अपघात आणि मृत्यूंमधील घट हे सुधारित अंमलबजावणी आणि जनजागृती उपायांचे प्रतिबिंब आहे. मात्र, गंभीर जखमींच्या संख्येत झालेली वाढ ही चिंतेची बाब असून त्यासाठी अधिक कठोर रस्ते सुरक्षा उपायांची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी अपघात वाढले आहेत त्या भागांवर आम्ही अधिक लक्ष देणार आहोत. यावर्षी आम्ही अपघातांचे प्रमाण किमान १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यादृष्टीने कामही सुरू करण्यात आले आहे.
- राजेंद्र प्रभुदेसाई, दक्षिण गोवा पोलिस उपअधीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

