
सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून एक अत्यंत दुःखद अपघाताची बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे गावाजवळ शनिवार (दि.२१) दुपारी रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण धडक होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षाचालकासह अन्य तिघांचा समावेश आहे. अपघातात जागीच प्राण गमावलेल्यांमध्ये संकेत घाडी, संतोष गावकर, रोहन नाईक आणि सोनू कोळंबकर यांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणाऱ्या एसटी बसची आणि समोरून येणाऱ्या रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षातील प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले.
घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी मद्यधुंद अवस्थेत असण्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.