
सासष्टी: श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यापासून विविध उत्सव सुरू होत आहेत. चतुर्थीला केवळ २० ते २२ दिवस बाकी असताना बाजारात नारळाचे दर गगनाला भिडले आहेत. एका नारळाची किंमत आकाराप्रमाणे २५ ते ६० रुपयांपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे गोमंतकीय त्रस्त झाले आहेत.
एरव्ही गोवा हा नारळ उत्पादनासाठी आघाडीवर होता. बाणावली व कळंगुट इथून नारळाचे उत्पादन जास्त होत असे. पण आता बांधकामांना ऊत आला आहे. भाटकार आपल्या भाटांचे काम करू इच्छित नाही. याचे मुख्य कारण मजुरी वाढली आहे. आता नारळांसाठी गोमंतकीय परावलंबी झाला आहे, असे नारळ विक्रेते चिराग पै काकोडे सांगतात.
गोव्यात जो नारळ मिळतो तो कर्नाटक व तमिळनाडूतून आयात केला जातो. हा नारळ ८५ रुपये प्रति किलो असा आणला जातो. जर त्या राज्यातून नारळांची आयात कमी झाली तर गोमंतकीयांना नारळांशिवाय अन्न शिजवावे लागेल, असेही काकोडे यांचे म्हणणे आहे.
सध्या जो दर आहे तो स्थिर राहणार व चतुर्थीला आणखी वाढणार नाही. अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
नारळाची किंमत वाढण्यास बागायतदार सुद्धा कारणीभूत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. बागायतदार भाटकारांकडून कितीही दराने नारळ खरेदी करतात अशी माहिती त्यांनी दिली.
गोव्यातील तापमानाचा उच्चांक यामुळे सुद्धा नारळाचे उत्पादन कमी झाल्याचे गुरुदास नावेलकर या विक्रेत्याने सांगितले. नारळाची वाढीव मागणी पाहता दर आणखी वाढण्याची शक्यता काही विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
गोव्यातील गृहिणींपुढे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोव्यात प्रत्येक अन्न पदार्थात नारळ असतो. भाज्यांच्या दर वाढलेल्या आहेत. त्यात नारळाचे दर वाढल्याने आमच्यापुढे मोठे प्रश्न चिन्ह उभे आहे असे एका गृहिणीने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.