
पणजी: भूतानी, लोढा यासारख्या समूहांच्या मोठमोठ्या निवासी प्रकल्पांना गोव्यात विरोध झाला आहे. अगोदरच अनेक गावांमध्ये उभारल्या जाणाऱ्या मोठ्या गृह प्रकल्पांमुळे पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. पाण्याची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, असा प्रकार असताना त्यात भर म्हणून बंगळुरूच्या ‘सत्त्व’ या रिॲलिटी ग्रुपने किनारी भागात दोन वर्षांत सुमारे ८०० कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.
एका वृत्तसंस्थेला या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय अग्रवाल यांनी माहिती दिली आहे. सत्त्व ग्रुपला किनारी भागातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय संधी दिसत असल्याने हा समूह त्यात गुंतवणूक करणार आहे. दक्षिण भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट फर्मपैकी एक असलेल्या या ग्रुपने काही वर्षांपूर्वी गोव्यातील बाजारपेठेत प्रवेश केला.
लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या घरांसाठी मोठी मागणी वाढत आहे. सुधारित पायाभूत सुविधा आणि भारतातील इतर शहरांशी चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सत्त्व ग्रुप गोव्यातील प्रॉपर्टी मार्केटमध्ये सहभाग वाढवत असल्याचे अग्रवाल यांचे म्हणणे आहे. येथील बाजारपेठेत अनिवासी भारतीयांचा मोठा रस असल्याचे ते सांगतात.
राज्यात गेल्या दहा वर्षांत परराज्यातील मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांनी शिरकाव केला आहे. किनारी भागात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना परवानगी देऊ नका, अशी मागणी आमदार दिलायला लोबो यांनी सरकारकडे केली होती.
विजय अग्रवाल म्हणाले, की या समूहाने ‘सत्त्व वॉटर्स एज’ हा पहिला गृहनिर्माण प्रकल्प विकसित केला आहे. त्याशिवाय व्हिला आणि अपार्टमेंटसह दुसरा टप्पा सुरू केला आहे. हा समूह राज्यात आणखी दोन प्रकल्पांची योजना आखत आहे, ज्यामध्ये गेटेड कम्युनिटीचा समावेश आहे, जिथे ते निवासी भूखंडांची विक्री होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.