वाळपई, मे महिन्यात कोसळलेला अवकाळी पाऊस व आता मॉन्सून पावसाच्या जोरावर सत्तरी तालुक्यात रस्त्यालगत नैसर्गिक पावसाळी भाज्या उगवण्यास सुरवात झाली आहे. तायकुळा, तेरे, अळू अशा भाज्यांचा आस्वाद पावसाळ्यात लोक अधिक करून घेतात.
पूर्वीच्या काळी मानव आपल्या परिसरात, रानात उगवलेल्या नैसर्गिक भाज्यांना महत्त्व देत अशा औषधी गुणधर्मांनी तयार झालेल्या भाज्यांचे सेवन करीत होता. सध्या पावसाळा असल्याने नैसर्गिक घटकांना बहर येऊ लागला आहे.
सत्तरीत तायकुळा वनस्पती मोठ्या प्रमाणावर उगवलेली आहे. मेथीच्या भाजीप्रमाणे दिसणारी कोवळी रोपे भाजीसाठी आणली जातात. तायकुळाच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. तायकुळाच्या पानांची भाजी सर्वप्रकारच्या त्वचारोगात औषधी म्हणून वापरतात. दुसरी म्हणजे कुर्डूची भाजी. याची कोवळी पाने शिजवून त्याची भाजी करतात.
दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात ही भाजी उपयुक्त आहे. कर्टोली एक फळभाजी असून कारल्यासारखी दिसते आणि कडूसुद्धा असते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते. कर्टोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
कपाळ फोडी ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीची वेल जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो.
विविध प्रकारच्या भाज्या
कुड्याच्या शेंगादेखील चटणी करण्यासाठी वापरल्या जात आहेत. कातने, हजार मूट, घोटशेरो, गुळवेल, गोयाटा, तेरे, बोणकाळो, पांढरा कुडा, कपाल फोडी, कुरडू, साळकाणो, सुरण, आघाडा, हरफूल, केना, पोपटा, भारंगी, रानमेथी, गुळवेल, घोटवेल, टेटू, दिणो, रानकर्मल अशा बरेचशा नैसर्गिक भाज्यांचा वापर लोक करीत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.