सांगे,पावसाळा सुरू होताच सर्वत्र धोकादायक वृक्षांकडे भीतीदायक नजरेने पाहिले जाते. कारण यापूर्वी सांग्यात झाड कोसळून एका महिलेचा बळी गेला आहे. त्या प्रसंगाची आठवण होताच आजही रस्त्याच्या बाजूला वाकलेल्या वृक्षांची भीती मनात उत्पन्न होत असते.
नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील जामगाळ भागात रस्त्याच्या दुतर्फा लावलेली गुलमोहरसारखी झाडे आता भल्या मोठ्या वृक्षात रूपांतरीत झाली असून बहुतेक वृक्ष मुख्य रस्त्याच्या बाजूने आहेत. जोपर्यंत वृक्ष मोडून पडत नाही, तोपर्यंत वन खाते दखल घेत नसतात. आज या भागातील वृक्षाची स्थिती पाहता वादळी वाऱ्यात जर वृक्ष उन्मळून पडले, तर या रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्यांचा नाहक बळी जाणार यात तिळमात्र शंका नाही.
या रस्त्यातून सांगे, कुडचडेच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसगाड्यांच्या फेऱ्या सतत सुरूच असतात. शिवाय चारचाकी, दुचाकीस्वारही ये-जा करीत असतात.
नैसर्गिक आपत्ती कक्षाने दुर्घटना घडल्यानंतर या भागात भेट देऊन पाहणी करण्यापेक्षा दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादायक वृक्षांची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी या भागातील जनतेकडून होऊ लागली आहे.
सर्वेक्षण केलेली झाडे कापलीच नाहीत
सांगेत दुर्घटना घडली, त्यावेळी रस्त्याच्या बाजूचे धोकादायक वृक्ष कापण्यासाठी सर्वेक्षण करून त्या वृक्षांवर क्रमांक घालण्यात आले होते, पण काही वृक्ष वगळल्यास बाकीचे वृक्ष जशाच तसे अजूनही आहेत. प्रशासन अशीच दुर्घटना घडल्यावर शिल्लक धोकादायक वृक्ष कापणार का? असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारला जात आहे. जामगाळ भागातील रस्त्याच्या बाजूने वाकलेला एक वृक्ष हे केवळ एक उदाहरण असून अशी अनेक धोकादायक झाडे या भागात आहेत.
पंचायतींचे दुर्लक्ष :
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धोकादायक झाडे कापण्यासाठी पंचायतींना विशेष अनुदान जाहीर केले आहे. यानंतरही अशी धोकादायक झाडे कापण्याकडे पंचायतींचे दुर्लक्ष होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.