

पणजी: गेल्या पाच वर्षांत गोव्यातील रस्ते अपघातांमध्ये १,३०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, या भीषण परिस्थितीला भाजप सरकारचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते समील वळवईकर यांनी आज केला.
पत्रकार परिषदेत वळवईकर यांनी राज्यातील रस्ते अपघातांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रवक्ते विवेक डिसिल्वा आणि मिनिन दा क्रूझ उपस्थित होते. वळवईकर म्हणाले, की २०२१ ते जानेवारी २०२६ या काळात राज्यात १,३०० हून अधिक जीवघेणे अपघात झाले.
ही माहिती काँग्रेसने नाही, तर खुद्द गोवा विधानसभेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेल्या चार महिन्यांतही अपघातांची मालिका थांबलेली नसून, दररोज सरासरी एका व्यक्तीचा बळी जात आहे. सरकार मात्र कार्यक्रमांच्या आयोजनात आणि सोहळ्यांत व्यस्त आहे.
वळवईकर म्हणाले, की गावागावांत दिशादर्शक फलक आणि सूचना चिन्हांचा अभाव आहे. रस्त्यांवरील खड्डे, निकृष्ट दर्जाची कामे आणि रस्ता अभियांत्रिकीमधील त्रुटींमुळे रस्ते ''मृत्यूचे सापळे'' बनले आहेत. अपघातप्रवण क्षेत्रे सुधारण्यात तसेच एआय आधारित कॅमेरे प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
गोव्यातील जनतेला सुरक्षित प्रवासाचा आणि जबाबदार प्रशासनाचा अधिकार आहे. मात्र, त्यांना केवळ पोकळ आश्वासने मिळत आहेत. आता केवळ घोषणा नको, तर सरकारने ठोस, पारदर्शक आणि कालबद्ध उपाययोजना राबवून नागरिकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी समील वळवईकर यांनी केली आहे.
वाहतूक पोलिसांची वानवा
क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणारी अवजड वाहने ‘हफ्ता’ देऊन सर्रास फिरत आहेत. या वाहनांवरील अतिरिक्त भारामुळे चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात घडत आहेत. तरीही प्रशासन कारवाई करण्यास असमर्थ ठरले आहे. वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या पोलिसांची संख्या अपुरी आहे. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात नसणे, हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याचे देखील वळवईकर यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.