

डिचोली: शेतीत साचलेला खनिज गाळ काढून आमची शेती पुनरुज्जीवित करा, अशी मागणी मयेतील शेतकऱ्यांनी केली. आम्ही महिनाभर वाट पाहू, तोपर्यंत शेती पुनर्जिवीत करण्याकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित खाणीवर धडक देऊन खाणीविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुळाक खाजन शेतकरी संघटनेचे सखाराम पेडणेकर आणि अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे.
पाटो-हळदणवाडी येथील शेतीजवळ पत्रकारांशी संवाद साधताना पेडणेकर यांनी शेतकऱ्यांची कैफियत मांडली. यावेळी यशवंत कारबोटकर, रोहिदास माईणकर आदी शेतकरी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात कृषी खात्यातर्फे मयेतील पडीक शेतीची पाहणी केली होती.
त्यावेळी खाण खाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तरीही आजपर्यंत शेतकऱ्यांचे दुखणे कुणी समजावून घेतले नाही. संबंधित खाण कंपनीकडून योग्य नुकसान भरपाई देण्यासही टाळाटाळ होत आहे. मिनरल फाऊंडेशन किंवा शेतकरी कल्याण निधीचाही शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही, अशी कैफियत सखाराम पेडणेकर आणि अन्य शेतकऱ्यांनी मांडली आहे.
खनिज गाळ साचल्याने पाटो-हळदणवाडी आदी परिसरातील जवळपास २० हेक्टर शेती काही वर्षांपासून पडीक आहे. दुसऱ्या बाजूने शेतीत ‘आकुर’ यासारख्या रानटी वनस्पती वाढल्या असून ‘पोय’ बुजून गेली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. शेतीत दलदल निर्माण झाली आहे. पॉवर टिलर आदी यत्रांद्वारे धड नांगरणीही करता येत नाही, असे सखाराम पेडणेकर आणि रोहिदास माईणकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.