

पणजी: सुका पुनर्प्रकिया करता येण्याजोगा कचरा देऊन पैसे मिळवण्याची संधी १ एप्रिलपासून मिळणार आहे. पर्यावरण खात्याने यासाठी बहुउद्देशीय योजना तयार केली आहे. सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष ॲंथनी देसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिलपासून मद्याच्या बाटल्या स्वीकारण्यासाठी
राज्यभरात ३०० ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय १ हजार रेस्टॉरंटमध्येही ही व्यवस्था असेल. तीन महिन्यांनंतर पाण्याच्या बाटल्या आणि त्यानंतर बिस्कीट, चिप्सची वेस्टने स्वीकारणे सुरू होईल. त्यानंतर इतर घनकचरा स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
सद्यस्थितीत पेय बाटल्यांना प्रतिकिलो १५ ते २५ रुपये किंवा ५० बाटल्या एकत्रितपणे विकल्या तरी एका बाटलीमागे ५० पैशांपेक्षा कमी दर मिळतो.
काचेच्या बाटल्यांना साधारणतः प्रतिबाटलीमागे २ रुपये मिळतात, तर बिस्किटे, वेफर्स पॅकेट आदींसाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टी-लेयर्ड प्लास्टिक पॅकेजिंगला जवळपास कोणतेही बाजारमूल्य नाही. त्यामुळे ते बहुतांशी गोळा केले जात नाहीत.
सामान्य पॅकेजिंगवर ५ रुपये, काचेच्या, मद्याच्या बाटल्यांवर १० रुपये, तर ५ ते २० रुपये किमतीच्या वस्तूंवर २ रुपयांचे डिपॉझिट निश्चित केले आहे. रिफंड थेट डिजिटल माध्यमातून तात्काळ दिला जाईल. वजनानुसार कचरा साठवण्याची गरज या प्रणालीत नाही, असेही देसा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या योजनेमुळे अनौपचारिक कचरा संकलकांना ५० पेट बाटल्यांमागे सुमारे २५० रुपये, म्हणजेच सध्याच्या उत्पन्नाच्या दहापटपेक्षा अधिक कमाई शक्य होणार आहे. काचेच्या बाटल्यांना प्रतिबाटली १० रुपये, तर मल्टी-लेयर्ड प्लास्टिक पॅकेट्ससाठी प्रथमच आर्थिक मूल्य निर्माण होऊन १०० पॅकेट्समागे सुमारे २०० रुपये मिळणार आहेत.
गोव्यात दररोज सुमारे ७६६ मेट्रिक टन घनकचरा निर्माण होतो, जो वार्षिक सुमारे २.८ लाख टनांपर्यंत पोहोचतो. शहरी भागात कचऱ्याचे प्रमाण जवळपास पूर्ण झाले असले तरी, कचऱ्याच्या प्रक्रियेतील व पुनर्वापरातील त्रुटी अजूनही कायम आहेत. या पोकळीत अनौपचारिक कचरा संकलक घरांमधून, रस्त्यांवरून व कचरा डेपोमधून पुनर्वापरयोग्य साहित्य गोळा करतात. मात्र, असुरक्षित परिस्थितीत केलेल्या या श्रमांच्या तुलनेत त्यांना मिळणारा मोबदला अत्यंत अपुरा आहे.
१ देसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेमून दिलेल्या ठिकाणी कचरा नेला आणि त्यावर ‘क्यू आर कोड स्कॅन’ केल्यावर यंत्र त्याचा युपीआय क्यू आर कोड स्कॅन करण्याचा किंवा मोबाईल क्रमांक नोंद करण्याचा पर्याय देईल. ती माहिती भरल्यावर चटकन ती रक्कम त्याच्या खात्यात जमा होणार आहे.
२ वस्तू खरेदी करतेवेळी डिपॉझिट रक्कम ग्राहकाकडूनच घेतली जाणार आहे. उदाहरणार्थ, पाण्याची बाटली १० रुपयांना मिळत असेल तर त्यावर २ रुपये डिपॉझिटच्या रूपाने घेतले जातील. ती पाण्याची बाटली नेमून दिलेल्या ठिकाणी परत केल्यावर ग्राहकाला २ रुपये परत मिळणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.