
सासष्टी: मडगावच्या रवींद्र भवनाचे मुख्य सभागृह व ब्लॅक बॉक्स अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. रवींद्र भवनाच्या छपरावरील पत्रे घालण्याचे काम पूर्ण झाले असले व पावसाचे पाणी आत येणार नाही याची दक्षता घेण्यात आली असली तरी मुख्य सभागृह तसेच ब्लॅक बॉक्सच्या फॉल्स सिलिंगचे तुकडे खाली पडत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या सुरक्षेचा विचार करून या दोन्ही सभागृहांत कुठलाही कार्यक्रम होणार नसल्याचे तालक यांनी सांगितले.
या निर्णयामुळे तियात्रिस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रवींद्र भवनाच्या या निर्णयामुळे आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल असे त्यांनी सांगितले. या निर्णयाची आधीच आम्हांला कल्पना दिली असती तर आम्ही यावेळी आमचे तियात्र रंगमंचावर आणलेच नसते.
किमान दोन हजार तियात्र कलाकार अडचणीत येणार अशी भीती ज्येष्ठ तियात्र कलाकार प्रिन्स जेकब यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात तियात्र होत असतात. मात्र आता ते पूर्णपणे बंद झाल्याने तियात्रिस्तांना मोठा फटका बसला आहे व कलाकारांमध्ये नाराजी पसरली आहे, असेही ते म्हणाले.
रवींद्र भवनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुठलेही कार्यक्रम करण्याचा धोका आम्ही पत्करू शकत नाही, असे तालक यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आम्ही तियात्र कलाकारांशी चर्चा केली असून त्यांना विश्वासात घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी काल ९ जून रोजी सभागृह व ब्लॅक बॉक्सची पाहणी केली व त्यांनी कार्यक्रम करणे धोक्याचे ठरेल असा अहवाल दिला आहे.
त्यात फॉल्स सिलिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग, एकॉस्टिक वॉल पॅनलिंगची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सभागृहातील फॉल्स सिलिंग भागावर ओलसरपणाही दिसत आहे. दरम्यान, गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष अँथनी फर्नांडिस यांनी तियात्रिस्तांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
रवींद्र भवन अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्याने तियात्रिस्तांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात सर्व निर्माते मोठ्या बजेटच्या तियात्रांची निर्मिती करतात. त्यांनी स्वत: खर्च करून तयारीही केली होती.
पण रवींद्र भवन बंद झाल्याने आता त्यांची मेहनत वाया जाणार आहे. शिवाय तियात्रावर जवळजवळ दोन हजार कलाकार जगतात, असे प्रसिद्ध तियात्रिस्त प्रिन्स जेकब यांनी सांगितले.
जर रवींद्र भवन दुरुस्तीसाठी अनिश्चित काळासाठी बंद ठेवायचे होते तर त्यांनी आम्हाला कमीत कमी तीन महिने तरी आधी सूचना द्यायला हवी होती.
सभागृह दुरुस्तीनंतर लवकर सुरू होईल, कदाचित जूनच्या मध्यास किंवा अखेरीस असे आम्हाला सांगण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रवींद्र भवनाच्या दुरुस्ती कामाला तीन ते चार महिने तरी लागतील. तरीसुद्धा नेमका किती वेळ लागेल हे आत्ताच सांगता येणार नाही, असे राजेंद्र तालक यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम खात्याने नियुक्त केलेला सल्लागार येऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर तो खर्चाचे अंदाजपत्रक व कामाच्या नियोजनाचा अहवाल देणार आहे.
त्यानंतर निविदा काढणे व कंत्राटदाराची नियुक्ती करणे आदी कामे आहेत.
या कामासाठी नेमका किती खर्च येईल हे सांगता येत नाही. पत्रे व संलग्न इमारतीची दुरुस्ती यासाठी अंदाजे २.५४ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती.
आम्ही सरकारला लवकरात लवकर निधी मंजूर करण्याची विनंती करणार आहोत. त्याचबरोबर मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सरकारकडून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे, असेही तालक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.