
फोंडा: राज्याचे माजी मुख्यमंत्री, कृषीमंत्री रवी नाईक यांचे मंगळवारी (१४ ऑक्टोबर) निधन झाले. पात्रांव म्हणून गोव्यात परिचित असलेल्या रवींची बहुजनांचे नेते अशीही ओळख होती. बुधवारी खडपाबांध येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींच्या अस्थींचे आज (१७ ऑक्टोबर) सकाळी खांडेपार नदीत विसर्जन करण्यात आले. कुटंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित हा विधी करण्यात आला.
रवींच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी शुक्रवारी सकाळी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार एकत्र झाले होते. रवींच्या अस्थी त्यांच्या निवासस्थान खडपाबांध ते खांडेपार नदीपर्यंत घेऊन जाण्यात आले. तेथे दत्त मंदिरानजीक त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. सकाळी साडे नऊ वाजता हा धार्मिक विधी पार पडला. उपस्थितांनी भावपूर्ण वातावरणात रवींना अखेर निरोप दिला.
मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास रवी नाईक यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. रवींकडे राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी होती. यापूर्वी त्यांनी राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. याशिवाय गृह, अर्थ खात्याची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली होती. खासदार म्हणून देखील त्यांनी संसदेत गोव्याचे प्रतिनिधीत्व केले होते. रवींच्या निधनाने बहुजनांचा कैवारी गेला अशी प्रतिक्रिया जनसामान्य देत आहेत.
रवींच्या निधनाने फोंडा विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. याठिकाणी त्यांचा मोठा मुलगा रितेश का धाकटा रॉय याला संधी मिळणार? हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, येत्या सहा महिन्यात फोंडा विधानसभेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे येथे निवडणूक होणार की रवी पुत्रांपैकी एकाला बिनविरोध संधी दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, रवींच्या निधनामुळे त्यांच्याकडे असलेल्या कृषी खात्याच्या मंत्रिपदाची जागा देखील रिक्त झाली आहे. कृषिमंत्री म्हणून सावंत सरकारमध्ये कोणाला संधी दिली जाणार हे देखील औसत्युक्याचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.