

पणजी: येत्या २२ जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज राज्य हवामान विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आला. राज्यातील धरणांमध्ये अजून महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा आहे. परंतु, पुढील १५ दिवसांत पाऊस न पडल्यास मात्र धरणांतील पाण्यात घट होऊन राज्यात ‘पाणीबाणी’चे संकट येण्याची शक्यता जलस्रोत खात्याने व्यक्त केली.
तर, येत्या २२ जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज राज्य हवामान विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आला. राज्यात यंदा मान्सून ५ जून रोजीच दाखल झाला. परंतु, ‘एल निनो’मुळे गेली १३ दिवस पाऊस रखडल्याने राज्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्यामुळे राज्यातील सातही धरणांतील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेत पाण्याबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे.
‘‘सद्यस्थितीतील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पाहिल्यास राज्याला पुढील महिनाभर पाण्याबाबत भीती बाळगण्याची गरज नाही. परंतु, १५ दिवसांत पाऊस न पडल्यास मात्र सर्वांनाच पाणी टंचाईस सामोरे जावे लागेल.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) २४ तास पाणी देण्याऐवजी तासानुसार पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे’’, असे जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर असे ‘गोमन्तक’शी संवाद साधताना सांगितले. पाणीसाठा संपेपर्यंत पाऊस न पडल्यास मात्र कोणताही पर्याय नाही, असे सालेलकर म्हणाले.
राज्यातील धरणांमधील पाण्याचा साठा कमी होत असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर मर्यादा आणण्याबाबत पिण्याचे पाणी आणि जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आज बैठक होणार असल्याची माहिती पिण्याचे पाणी खात्याचे मुख्य अभियंता सुभाष भेंडे यांनी सांगितले.
प्रत्येक भागात पाणी पुरवठा वेगवेगळ्या वेळी होतो. शुक्रवारच्या बैठकीत या तासांचा आढावा घेऊन तसेच धरणांतील पाणीसाठ्याचा विचार करून भागांनुसार तास बदलतील.
राज्याला सध्या दररोज ६७५ एमएलडी पाण्याची गरज भासते. सध्या मान्सूनचा पाऊस रखडला असला, तरी तेवढेच पाणी सध्याही देण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यंदा सरासरी पावसात ६६ टक्क्यांची तूट
राज्यात १ ते १८ जून या मान्सून हंगामात सरासरी ४९० मिमी पावसाची नोंद होते. परंतु, यंदा या कालावधीत केवळ १६५.९ इंच पाऊस पडला आहे. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत यंदा पावसात ६६ टक्क्यांची तूट असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान शास्त्रज्ञ नहुष कुलकर्णी म्हणतात... बुधवार आणि गुरुवारप्रमाणेच पुढील दोन दिवस राज्यात पावसाची उघडीप असेल. २२ जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम असेल. राज्यातील शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसारच शेतीची कामे हाती घेणे महत्त्वाचे आहे.
वाऱ्याचा प्रवाह होणार कमकुवत
पश्चिम हिंदी महासागर आणि अरबी समुद्रावरील विषुववृत्त ओलांडून येणारा वाऱ्याचा प्रवाह हा मान्सूनसाठी आर्द्रतेचा प्रमुख स्रोत आहे. अलीकडच्या काळात हा कमकुवत झाला आहे. यामुळे मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि पश्चिम किनारपट्टीलगत पुरेशा तीव्रतेचा किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा यासारख्या महत्त्वाच्या मोसमी हवामान प्रणाली सध्या अस्तित्वात नाहीत, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.