

पणजी: प्राध्यापिका गौरी आचारी यांच्या खून प्रकरणातील संशयित गौरव बिद्रे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पुन्हा दणका दिला आहे. केवळ खटल्याला विलंब होतो, या कारणास्तव गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्या. श्रीराम शिरसाट यांनी गौरवचा चौथा जामीन अर्ज फेटाळून लावला.
जून २०२२ मध्ये जुने गोवे येथे प्राध्यापिका गौरी आचारी यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गौरव बिद्रेला अटक केली असून, त्याच्यावर कलम ३६५, कलम ३४२, कलम ३०२ आणि कलम २०१ यांसारखे गंभीर आरोप आहेत.
गौरव तेव्हापासून कोठडीत आहे. गौरवच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, संशयित जून २०२२ पासून म्हणजे सुमारे साडेतीन वर्षांपासून तुरुंगात आहे. घटनेला प्रदीर्घ काळ लोटला असून खटल्याचे कामकाज अत्यंत संथ गतीने सुरू आहे. संविधानाच्या कलम २१ नुसार आरोपीला ‘जलद सुनावणी’चा अधिकार असून, विलंबामुळे त्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे त्याला जामिनावर मुक्त करावे.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार केल्यानंतर निरीक्षण नोंदवले की, या खटल्यात आतापर्यंत चार साक्षीदारांची तपासणी झाली असून सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे.
सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध
यावेळी सरकारी वकिलांनी गौरवच्या जामिनाला कडाडून विरोध केला. गौरवविरुद्ध केवळ खुनाचाच नव्हे, तर विनयभंग आणि इतर कलमांखाली आणखी एक गुन्हा प्रलंबित आहे. तो जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.