
सासष्टी: एक जूनपासून पुढील दोन महिने सरकारने मासेमारी बंदी जाहीर केल्याने कुटबण जेटीवर सध्या सामसूम आहे. मात्र, यापूर्वी जेव्हा येथे कॉलराची लागण झाली, तेव्हा सरकारने अनेक आश्वासने दिली होती; पण त्यांची पूर्तता झालेली नाही.
येथे ५० शौचालयांची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, आठ महिने झाले तरी काम पूर्ण झालेले नाही. ऑगस्टपूर्वी काम पूर्ण होईल, याबद्दल साशंकता वाटते, असे दक्षिण गोवा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष तथा बोटमालक सावियो डिसिल्वा यांनी सांगितले.
जवळपास सर्वच बोटमालकांनी आपल्या बोटी जेटीवर आणून ठेवल्या आहेत. कामगारही घरी परतू लागले आहेत. काहीजणांना बसने पाठविण्याची व्यवस्था केली आहे. एरव्ही पाच ते दहा जूनपर्यंत जेटीवर रेलचेल असायची; पण यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने तसेच खोल समुद्रात जायला बंदी असल्याने बोटमालकांनी नियोजित वेळेपूर्वीच बोटी जेटीवर आणून ठेवल्या आहेत. बोटींची स्वच्छता करणे, जाळी बांधून ठेवणे ही कामे सुद्धा लवकर पूर्ण केली. आता नवीन हंगाम एक ऑगस्टपासूनच सुरू होईल, अशी माहिती डिसिल्वा यांनी दिली.
या जेटीवरील कामगारांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कामगार जेव्हा परत येतील, तेव्हा लागलीच त्यांची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य खात्याचे डॉक्टर, अधिकाऱ्यांनी येथे उपस्थित असणे गरजेचे आहे, असेही सावियो डिसिल्वा यांनी सांगितले.
सध्या या जेटीवर ३ हजार कामगार व ३०० बोटी आहेत. कुटबण जेटी ही मच्छीमार व्यवस्थापन खात्याने ताब्यात घेतली आहे. मात्र, येथे जी सुधारणा करायला हवी, ती केलेली नाही. येथे देखरेख करण्यासाठी तसेच माल उतरविणे आणि भरण्यास जागा नाही. त्यामुळे अडचणी येतात. मच्छीमार व्यवस्थापन खात्याला ही जबाबदारी पेलवत नाही. त्यासाठी आम्ही महासंघाची स्थापना केली आहे. या जेटीचा ताबा या महासंघाकडे द्यावा, अशी मागणी डिसिल्वा यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.