
Pramod Sawant completes six years as Goa Chief Minister
पणजी: स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदी कोण, असे मोठे प्रश्नचिन्ह भाजपसमोर सहा वर्षांपूर्वी होते. तत्कालीन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली आणि त्यांनी ती सार्थ ठरविली. उद्या (ता.१९) त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीला सहा वर्षे पूर्ण होत आहेत.
स्व. पर्रीकर आजारी असल्याने त्याआधी वर्षभर प्रशासन सैलावले होते. त्यामुळे रात्री उशिरा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या डॉ. सावंत यांच्यासमोर आव्हानांचा प्रचंड डोंगर होता. मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याआधी मंत्रिपदीही काम करण्याचा अनुभव नसताना त्यांनी अल्पावधीत प्रशासनावर पकड जमवली. राज्याला भेडसावणारे प्रश्न निकाली काढतानाच, कोविड काळातील आव्हाने समर्थपणे पेलली आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ करण्याच्या दिशेने दमदार पावले टाकली.
गोव्याच्या विकासाचा ध्यास घेत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने मागील पाच वर्षांत राज्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्याने पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि प्रशासन आदी क्षेत्रांत अभूतपूर्व प्रगती साधली. त्यांच्या दूरदृष्टीच्या योजनांमुळे राज्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावले असून, गोवा सतत आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात गोव्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित केल्या गेल्या. गोव्याच्या सर्व भागांना उत्तम वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन महामार्ग आणि उड्डाण पूल बांधले गेले. प्रमुख शहरांतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक बगल रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले.
गोव्याच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आला. यामुळे राज्यात नवीन रोजगार संधी निर्माण झाल्या आणि गोवा जागतिक स्तरावर अधिक सहज उपलब्ध झाला.
पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्यात आली. स्वच्छता मोहिमा, पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण आणि पर्यटकांसाठी आकर्षक सुविधा निर्माण करण्यात आल्या. गोव्याला आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विविध योजनांवर भर दिला गेला. गोव्यातील ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि चर्च यांचे पुनरुज्जीवन करून पर्यटनासाठी खुली करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी शालेय पातळीवर कोडिंग आणि रोबोटिक्स विषय सुरू करण्यावर भर दिला. त्यामुळे येणारी पिढी स्पर्धेला तोंड देण्यासाठी त्यांनी सक्षम बनवली आहे. सरकारी शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा उंचावण्यात आला. नवीन प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण आणि शिष्यवृत्ती योजनांमुळे विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळाल्या.
तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आली. डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित कौशल्यांचे महत्त्व ओळखून अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना अधिक सक्षम केली. ग्रामीण आणि शहरी भागात नवीन आरोग्य केंद्रे सुरू केली. आधुनिक शेती तंत्रज्ञान, जलसंधारण, सेंद्रिय शेती यांवर भर दिला. शेतकऱ्यांना अनुदाने आणि सवलती मिळाव्यात, यासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.
मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास, गोव्यातील मच्छीमार बांधवांसाठी विशेष अनुदाने, प्रशिक्षण आणि नवीन तंत्रज्ञान यांची उपलब्धता वाढवण्यात आली.
राज्यातील जलसंपत्ती टिकवण्यासाठी धरणे, बंधारे आणि जलसंधारण प्रकल्प हाती घेण्यात आले. पर्यावरणपूरक धोरणांवर भर देत, वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्त गोवा यासारख्या उपक्रमांना चालना देण्यात आली.
महिला स्वयंरोजगारासाठी विशेष कर्ज योजना सुरू करण्यात आल्या. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला हेल्पलाईन सेवा अधिक बळकट करण्यात आली. सरकारी कामकाज डिजिटल करण्यात आले. ऑनलाईन सेवा अधिक प्रभावी करण्यात आल्या. गोव्यात नवीन उद्योग आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक गुंतवणूक प्रोत्साहन योजना राबवल्या.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणारे नेते ठरले आहेत. त्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक ठोस निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वामुळे गोवा हे अधिक सक्षम, स्वच्छ आणि प्रगत राज्य बनत आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि कृषी क्षेत्रात झालेली प्रगती यांमुळे गोव्याचा विकासदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.