
पणजी: उड्डाणपुलाच्या कामामुळे रविवारी दुपारी गिरी ते पर्वरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली. सेगमेंट हलवण्याचे काम भर दुपारी केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या कोंडीमुळे वाहनचालक व प्रवाशांना तासन्तास वाहतुकीत अडकून पडावे लागले. रुग्णवाहिकाही त्यातून सुटल्या नाहीत.
गिरी पेट्रोलपंपापर्यंत ही वाहतूक कोंडी पोहोचली. त्यामुळे जवळपास ७०० मीटरचा रस्ता ठप्प झाला होता. एक तर रस्ता खराब, सर्वत्र खडी आणि धूळ. खड्डेही मोठ्या प्रमाणात आहेत. अशा स्थितीत दुपारी मोठ्या यंत्रसामग्रीसह सेगमेंट हलवण्याचा निर्णय चुकीचा आहे.
जेव्हा रस्त्यावरची रहदारी कमी असते तेव्हाच अशी कामे केली पाहिजेत. तसेच अवजड वाहनांची वाहतूक रात्रीच्या वेळेत केली गेली पाहिजे, असे संतप्त वाहनचालकांनी सांगितले.
वाहतूक विभाग आणि काम करणाऱ्या एजन्सीमध्ये असलेला समन्वयाचा अभाव यामुळे ही घटना घडली. सेगमेंट हलवताना वाहतूक पोलिसही नव्हते. विशेष म्हणजे या कामाची पूर्वकल्पनाही नागरिकांना देण्यात आली नव्हती. तसेच वाहतूक वळवण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती.या घटनेमुळे पुन्हा एकदा कामाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गिरी-पर्वरी उड्डाणपुलाच्या कामामुळे भविष्यात वाहतूक सुलभ होईल, हे खरे आहे. मात्र सद्यःस्थितीत लोकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. यासंदर्भात वाहतूक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांनी एकत्र येऊन जाहीर वेळापत्रक तयार करावे, अवजड वाहतूक रात्रीच्या वेळेत करावी आणि पर्यायी मार्गांची माहिती लोकांना दिली पाहिजे, आदी मागण्या आजच्या घटनेनंतर जोर धरू लागल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.