
Porvorim Flyover Construction Problems
पणजी: पर्वरी येथे महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि दुचाकी चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. कामाच्या ठिकाणी उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
धूळ नियंत्रणासाठी प्रशासनाकडून पाणी मारले जात आहे. मात्र, त्यामुळे रस्त्यावर चिखल बनत असल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
या स्थितीवर नियंत्रणासाठी रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे असल्याचे मत वाहनचालक व्यक्त करत आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडी ही पर्वरी मार्गावरील मोठी समस्या बनली आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे वाहनांची वाहतूक मंद गतीने सुरू असून वाहतूक कोंडी दररोज १० ते ३० मिनिटे भोगावी लागत आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने कोंडीचा त्रास अधिकच वाढला आहे.
अपघात आणि कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या मते, रस्त्यावरील काम लवकर पूर्ण करणे, वाहतूक व्यवस्थापनासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आणि धुळ नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गोवा सरकारने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिकांकडून व वाहनचालकांकडून केली जात आहे.
रस्त्याच्या कामामुळे आणि वाहनांच्या वर्दळीमुळे उडणारी धूळ वाहनचालकांसाठी तसेच स्थानिक रहिवाशांसाठी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. यामुळे श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ झाली असून वाहनचालकांना धुळीमुळे नेत्रविकाराची समस्या भेडसावत आहे. रात्रीच्या वेळी कमी प्रकाशामुळे वाहन चालवणे धोकादायक बनत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.