
पर्वरी: गिरी-पर्वरी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामामुळे परिसरात निर्माण होणारी धूळ रोखण्यासाठी दिवसाला चार वेळा टॅंकरद्वारे पाण्याची फवारणी करण्याचे आश्वासन प्रकल्पाचे उपाध्यक्ष राजदीप भट्टाचार्य यांनी दिले. धुळीच्या तक्रारीनंतर सुकूर पंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
कामाचा वेग अधिक असून आणि उन्हामुळे टँकरद्वारे मारलेले पाणी लवकर सुकते, त्यामुळे कामाच्या ठिकाणी चार टँकर तैनात करण्याचा निर्णय घेतल्याचे भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दिनेश तारे, सुकूर पंचायत सरपंच सोनिया पेडणेकर, पंच सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार भट्टाचार्य यांनी उड्डाणपुलाचा आराखडा सादर करत विस्तृत माहिती दिली. उड्डाणपूल सहापदरी असून त्याची रुंदी २५ मीटर असेल. पुलाखालील सर्व्हिस रस्त्याची रुंदी खांब मध्यवर्ती पकडून दुतर्फा प्रत्येकी १२.५ मीटर असेल. या रस्त्याचे स्वरूप चारपदरी असून उजव्या बाजूला दुपदरी आणि डाव्या बाजूला दुपदरी रस्ता असेल.
उड्डाणपुलाच्या कामासाठी कापण्यात येणाऱ्या झाडांबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात भट्टाचार्य म्हणाले, सरकारने ६१६ झाडे कापण्यास परवानगी दिली असून आतापर्यंत ४४७ झाडे कापली आहेत. कापलेल्या झाडांऐवजी तिप्पट झाडे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, झाडे (Trees) लावण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. जर त्यांनी आम्हांला ही झाडे लावण्याचा आदेश दिला, तर ती लावावी लागतील, परंतु यावर अजून निर्णय झालेला नाही.
सरपंच सोनिया पेडणेकर यांनी बैठकीनंतर सांगितले, की ग्रामस्थांनी उड्डाणपुलाच्या कामाबाबत माहिती मागितल्याने ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेला घुमटीचा विषय या बैठकीत उपस्थित करण्यात आलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.