

माजी कृषीमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या फोंड्यातील पोटनिवडणुकीत भाजप कुणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. ‘मगो’ पक्षाने तर रवींचे ज्येष्ठ सुपूत्र रितेश नाईक यांना बिनविरोध निवडून आणण्याचे आवाहन सर्वच राजकीय पक्षांना केले आहे. तर, भंडारी समाजानेही रितेश यांना आताच मंत्रिमंडळात घेऊन फोंडा पोटनिवडणुकीची उमेदवारी त्यांनाच देण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली आहे. त्यातच आता रवींचे कनिष्ठ सुपूत्र तथा नगरसेवक रॉय नाईक यांनीही पक्षाने उमेदवारी दिल्यास आपलीही निवडणूक लढवण्याची तयारी आहे, असे स्पष्ट केल्यामुळे भाजपसमोरील पेच काही प्रमाणात वाढला आहे. यातून भाजप योग्य पद्धतीने मार्ग काढणार? की तिसऱ्यालाच उमेदवारी मिळणार? हीच चर्चा फोंड्यात सुरू आहे. ∙∙∙
उगवे परिसरात मंगळवारी गोळीबार झाला. त्यात दोघे जखमी झाले. मात्र त्यानंतर दिवसभर पोलिस प्रचंड तणावाखाली होते. रेती काढण्याच्या वादातून हा गोळीबार झाला, असे सांगताही येत नाही हा तणाव पोलिस अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर एक वेगळीच चर्चा ऐकू येत होती. शिकारीला गेलेले असताना गोळीबार झाला आणि ते जखमी झाले, अशी कथा रचण्यात येत असल्याचे बोलले जात होते. गोळीबार झाला तर तो कोणत्या हत्याराने झाला हेही न सांगण्याइतपत दबाव होता, आता बोला ! ∙∙∙
मुख्यमंत्र्यांनी सरकारची माझे घर योजना प्रतिष्ठेची मानली आहे व त्यासाठी म्हणे प्रत्येक रविवारी त्या योजनेचे अर्ज वितरित करण्यासाठी ते सगळीकडे फिरत आहेत. भाजपवाले या योजनेचा फायदा निवडणुकीत कॅश करण्यासाठी वावरू लागले आहेत. मुद्दा तेवढ्यावर संपत नाहीत तर दोतोर मुख्यमंत्र्यांनी सांताक्रुझमध्ये या प्रकरणात घेतलेली आक्रमक भूमिका व विरोधकांना केलेले लक्ष्य पाहता भाजप या योजनेचा लाभ उठविण्यासाठी वाटेल ते करेल असे विरोधी नेते म्हणू लागले आहेत. व त्याचाच धसका त्यांनी घेतल्याचे दिसते. एकजात सगळे विरोधक आता संधी मिळेल तेथे या योजनेवर घसरताना दिसत आहेत. त्यांनी या योजनेतून भाजप परप्रांतीयांना लाभ मिळवू देऊ पाहतो, हा त्यांचा आरोप तेच दर्शवतो. पण त्यांतून परप्रांतीय मतदारांना ते दुखावणार नाहीत ना, हा मुद्दाही आहे खरा. ∙∙∙
विरोधी पक्षांनी संभाव्य वीजदरवाढीसंदर्भात सरकारला म्हणजेच भाजपला कात्रीत पकडले होते व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी तर सोमवारी मुख्य वीज अभियंत्याच्या कार्यालयावर धडक देऊन त्यांना या दरवाढीबाबत जाबही विचारला. पण ज्या वेळी हा जाब विचारण्याचा कार्यक्रम सुरु होता नेमके त्याच वेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना वीजदरवाढीचा मुळांत प्रस्तावच नसून चुकीच्या माहितीच्या आधारे हा सगळा कांगावा चालू असल्याचे सांगून एकप्रकारे जबरदस्त शॅाकच दिला. त्यांनी विरेाधकांना संभ्रमित न होण्याचा सल्लाही दिला. पण मुद्दा तोही नाही. तर गेले अनेक दिवस वीजदरवाढीच्या मुद्द्यावर सगळीकडे गदारोळ सुरु असताना सरकारने त्यावर स्पष्टीकरण का दिले नाही, हा आहे. ∙∙∙
पात्रांव गेल्यानंतर आता फोंड्यातील राजकारणाने गती घेतली आहे. पात्रांवच्या शोकसभेला उपस्थित जनसमुदाय पाहून विरोधकांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. आता पात्रांव गेल्यानंतर फोंड्यावर आपलाच दावा, अशा थाटात अनेकजणांनी अंतर्गत प्रचाराला सुरवातही केली आहे. विशेष म्हणजे सुरवातीला फोनाफोनी होत होती, पण आता प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देण्यात येत आहे. सध्या भाजपकडून उमेदवार निश्चिती झालेली नाही तरीही आपण उमेदवार असल्याच्या थाटात भाजपच्या काही संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे. अन्य राजकीय पक्षांबरोबरच काहीजण अपक्ष उमेदवारी दाखल करण्याच्या उमेदीत असून पात्रांवनंतर आपणच फोंड्याचे प्रतिनिधीत्व करू शकतो, अशी दर्पोक्ती बऱ्याचजणांकडून व्यक्त होत आहे. ∙∙∙
परवा गोव्यात विविध भागांत छठपूजा उत्साहात व प्रचंड गर्दीत पार पडली. फोंड्यासारख्या भागांत असलेली पाच हजारांवर लोकांची उपस्थिती पाहून नीज गोंयकारांच्या भुवया म्हणे उंचावल्या. कारण केवळ फोंडा येथेच नव्हे तर वास्कोतील बायणा किनारा, सासष्टीतील कोलवा, मिरामार, पाळोळे, हरमल सारख्या भागांतील छठपूजेतील उपस्थितीची समाजमाध्यमांवर फिरणारी छायाचित्रे डोळे विस्फरायला भाग पाडणारी आहेत. हे असेच चालू राहिले तर आणखी काही वर्षांनी हा गोव्याचाच उत्सव तर ठरणार नाही ना, असा प्रश्न काहीजण विचारत आहेत. त्यानंतर गोंय, गोंयकार, गोंयकारपण हा मुद्दा तसेच स्थानिकांना नोकऱ्यांत आरक्षण यासारखी मागणी करण्याचे धाडस कोणी करणार नाही म्हणे. ∙∙∙
कधी नव्हे ते यावर्षी पावसाची नानाविध रूपे आता लोकांना पहायला मिळताहेत. सोशल मीडियात तर पावसाच्या ऐन दिवाळीसणात अन् वेळी- अवेळी बरसण्याच्या वृत्तीचा ‘नेटकरी’ आपापल्या परीने समाचार घेताहेत. कुणी म्हणतो, राजकीय नेत्यांच्या पापाचा घडा प्रमाणापेक्षा अधिक भरू लागल्यामुळे देशात निसर्गचक्र उलटे फिरू लागले आहे, कुणी म्हणतो, उन्हाळ्यात अर्थात मे महिन्यात सुरू झालेला पाऊस नवरात्रीत बरसला, दसऱ्यालाही बरसला, एवढेच काय दिवाळीत नरकासुरांनाही भिजवून गेला. परतीच्या पावसाने मुक्काम लांबवल्यामुळे आता काय ३१ डिसेंबरची पार्टीही करून जाणार का?, अशी विचारणाही करू काही नेटकरी करू लागलेत! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.