
फोंडा: धारबांदोडा तालुक्यातील पंचायत क्षेत्रातील दूधसागर नदीत बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण बरेच वाढल्याने उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी याची दखल घेतली आहे. धावकोण-ताकार तसेच अन्य ब्लॅक स्पॉटवर कुळे व फोंडा पोलिसांना गस्त वाढविण्याचा आदेश दिला व शनिवारी तसेच रविवारी अधिक गस्त घालण्यास सांगितले आहे.
सोमवार, २८ रोजीपासून सकाळी ओकांब येथील नदीवर जाणाऱ्या रस्त्यावरील गेटला कुलूप लावण्यात आले, त्यामुळे येथील नागरिकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
धावकोण-ताकार येथील नदीत गेल्या गुरुवारी तर ओकांब येथील दूधसागर नदीवर शनिवारी दुपारी आंघोळीसाठी गेलेल्या युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. तरीही पर्यटकांची अंघोळीसाठी गर्दी वाढत असल्याने उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी दखल घेऊन कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला.
त्यानुसार सोमवारी सकाळपासून ओकांब येथील नदीवर जाणाऱ्या रस्त्यावरील गेटला कुलूप लावले आहे. तर धावकोण-ताकार येथील दूध सागर नदीत अजूनही पर्यटक आंघोळीसाठी येत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या ठिकाणी कुळे पोलिसांनी गस्त घालावी, असा आदेशही धायगोडकर यांनी दिला आहे.
धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी मोले, कुळे, शिगाव पंचायत क्षेत्रातील नदीवर दुर्दैवी घटना घडत असल्याने दूधसागर नदीच्या क्षेत्रात येणाऱ्या पंचायतीच्या पंच व सरपंचांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. स्थानिकांनीही नदीवर पर्यटक दिसून आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे सांगितले आहे.
सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रात येत असलेल्या उस्ते गावात बंधाऱ्यावर शनिवार, रविवार व अन्य दिवशीही प्रचंड प्रमाणावर आंघोळीच्या निमित्ताने दारू पिऊन मजा लुटण्यासाठी राज्यातील विविध भागातून लोक येत आहेत. सायंकाळी जाताना दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा बंधाऱ्याच्या परिसरात टाकला जातो आहे. वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडाच्या मुळांवर दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकल्याचे निदर्शनास आले आहे. मद्यधुंद होऊन नागरिक सत्तरीत अनेक ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांवर येत आहेत. अशावेळी त्या भागात कचरा केला जातो. यावर आळा घालण्यासाठी स्थानिक पंचायतींनी बंधाऱ्यांवर जाण्यास लोकांना बंदी घालण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.
धारबांदोडा पंचायतीचे सरपंच विनायक ऊर्फ बालाजी गावस यांनी यापूर्वी ब्लॅक स्पॉटवर फलक लावून पंचायतीतर्फे पर्यटकांना सूचना देण्याचा प्रयत्न केला; पण पर्यटकांकडून दाद मिळत नाही. उलट पर्यटक आणि स्थानिक यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने उचित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे गावस यांनी सांगितले.
मोले पंचायतीचे सरपंच सुहास गावकर यांनी काजूमळ-पेरीमळ या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी आंघोळीसाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडून धारबांदोडा येथील युवक बुडाला होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्थानिकांच्या सहकार्याने पंचायत योग्य दखल घेणार असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.