पणजी: राज्यात काही दिवसांपूर्वी पिटबुलने लहान मुलाचा घेतलेल्या बळीनंतर पशुसंवर्धन खात्याने राज्यात कुत्रा पाळणाऱ्या मालकांसाठी मार्गदर्शन तत्त्वे जारी केली आहेत. यापुढे एखादा व्यक्ती आपल्या घरात कुत्रा पाळत असेल आणि त्या कुत्र्यांमुळे मानव किंवा प्राण्यांना इजा झाल्यास किंवा धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्या मालकाची असेल, असे प्रतिज्ञापत्र पशुसंवर्धन खात्याला द्यावे लागणार आहे, अशी अधिसूचना पशुसंवर्धन खात्याद्वारे काढण्यात आली आहे.
जर कुत्र्यामुळे कुणाला त्रास किंवा हानी झाल्यास, तसेच मालकाने कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास त्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
त्यामुळे आपल्या पाळलेल्या कुत्र्यांची योग्य काळजी न घेतल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या कुत्र्यांमुळे प्राणी किंवा मानवाला इजा पोहोचली तर त्याची संपूर्ण जबाबदारी मालकाची असेल व त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च मालकाला करावा लागणार आहे. आपण पाळत असलेल्या कुत्र्यासंबंधीची माहिती पशुसंवर्धन खात्याला देणे बंधनकारक केले आहे. कुत्र्याचे नाव, जन्म, ब्रीड, लिंग तसेच इतर माहितीसह आपण पाळत असलेल्या कुत्र्यामुळे जर कुणाला त्रास किंवा इजा झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल, असे प्रतिज्ञापत्र पशुसंवर्धन खात्याला मालकाला द्यावे लागणार आहे.
जर एखादा व्यक्ती कुत्रा पाळत असेल तर त्याने सार्वजनिक ठिकाणी त्याला नेताना त्याच्या गळ्यात साखळी असणे तसेच त्याच्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
कुत्र्याच्या मालकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. जर आपण पाळत असलेल्या कुत्र्याला रेबीज झाल्याचे समजल्यास तत्काळ मिशन रेबीज हॉटलाइनवर कळविणे गरजेचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.