Morjim News : पोरसकडे-मालपे बगलमार्ग धोकादायक; दरड कोसळण्याची भीती

Morjim News : गेल्या पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता, परंतु यंदा तो सुरू करण्यात आला. परंतु डोंगर कापणीमुळे हा रस्ता धोकादायक बनला असून पावसाळ्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Morjim
MorjimDainik Gomantak

Morjim News :

मोरजी, पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पोरस्कडे - न्हयबाग - मालपे बाजूने जो मोठ्या प्रमाणावर डोंगर कापून बगलमार्ग केला आहे, त्याच रस्त्याच्या बाजूची गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती.

गेल्या पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता, परंतु यंदा तो सुरू करण्यात आला. परंतु डोंगर कापणीमुळे हा रस्ता धोकादायक बनला असून पावसाळ्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी दरड कोसळू नये म्हणून संरक्षक भिंत उभारलेली आहे. ती संरक्षक भिंत यंदाच्या पावसाळ्यात सुरक्षित राहील की दरड कोसळेल? अशी भीती नागरिक, वाहनचालक, तसेच सामाजिक कार्यकर्ते उदय महाले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Morjim
Goa: विनाहात पायाचे मूल जन्माला येईल, 15 वर्षापूर्वी डॉक्टर म्हणाले होते पुन्हा विचार करा; पण मुलाने चमत्कार केला

तसेच या ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळू नये यासाठी संबंधित कंत्राटदार कंपनी व सरकारने याची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

या राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राट एम. व्ही. आर. या कंपनीला देण्यात आले आहे, परंतु सुरवातीपासून धारगळ - महाखाजण ते पत्रादेवीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना कंत्राटदार कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

कंत्राटदार कंपनीने महामार्गाचे काम करताना रस्त्याचे कशा पद्धतीने रुंदीकरण करणार, कुठे उड्डाणपूल उभारणार याची साधी माहितीही संबंधित पंचायत मंडळांना व शेतकऱ्यांनाही दिली नाही. डोंगर मनमानी पद्धतीने कापले तरीही टीसीपीने या डोंगर भागाकडे लक्ष दिले नाही. त्याचेच परिणाम आज जनतेला भोगावे लागत आहेत.

रस्ता ओलांडताना धोका

रस्ता करताना गावातील शेतकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता मिळेल तशी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तसेच शेतात जाणारी वाट, मंदिरात सार्वजनिक कार्यक्रमासाठी जाणारे रस्ते मातीचा भराव टाकून बंद केले आहेत. गावातील शेतकऱ्यांची घरे एका बाजूला, तर शेती रस्त्याच्या पलीकडे असल्यामुळे रोज अपघात होत असतात.

मालपे ते न्हयबाग हा महामार्गावर बगलमार्ग करण्यात आला आहे, पण हा रस्ता करताना बाजूचा डोंगर व्यवस्थित कापलेला नाही. सरळ रेषेत डोंगर कापल्यामुळे गेल्या पावसाळ्यात या डोंगराची मोठी दरड कोसळली होती. सुदैवाने तेव्हा या रस्त्यावरून वाहतूक बंद होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरड कोसळलेल्या परिसरात मागच्या काही महिन्यांपासून संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे, परंतु पावसाळ्यात ही संरक्षण भिंत डोंगराला किंवा दरडीला खरोखरच संरक्षण देणार आहे का? याकडे सरकारने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. - उदय महाले,

सामाजिक कार्यकर्ते

Morjim
Goa Congress : दोन्ही जागांवर काँग्रेस जिंकणार : माणिकराव ठाकरे

दगड हटविण्याची मागणी

या महामार्गासाठी डोंगर कापताना रस्त्याच्या बाजूलाच जे भले मोठे दगड टाकले आहेत. ते दगड अजूनही तेथून हटविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात हे दगड घरंगळून रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. कापलेल्या डोंगराला जाळ्यांचे संरक्षक आच्छादन लावण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात हळूहळू दरड कोसळून रस्ता धोकादायक ठरू शकतो.

तीन उड्डाण पुलांची गरज

पेडणे - मालपे येथे डोंगर कापणी करून रस्ता केला आहे. त्याला संवरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. ही संरक्षण भिंत धोकादायक असून पावसाळ्यात हा रस्ता धोकादायक ठरू शकतो. न्हयबाग पोरस्कडे जंकशन, धारगळ आणि उगवे येथे उड्डाण पुलांची गरज होती, पण तेथे उड्डाण पूल नसल्याने लहान मोठे रोज अपघात होत आहेत. सरकारने लक्ष घालून पुढील जीवित हानी टाळावी अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com